Beed Crime: आरोपीच्या या अर्जावर फिर्यादी पक्षाकडून, विशेषतः धनंजय देशमुख यांनी अत्यंत तीव्र शब्दांत आक्षेप नोंदवला होता.
जयराम चाटेचा न्यायालयाकडे अर्ज
या प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक असलेला जयराम चाटे याने न्यायालयाकडे एक विनंती अर्ज दाखल केला होता. आपल्या भावाचा मृत्यू झाल्याचे कारण देत, भावाच्या पश्चात करावयाच्या धार्मिक विधींसाठी आपल्याला काही काळासाठी बाहेर जाण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी चाटे याने या अर्जाद्वारे केली होती. या अर्जानंतर न्यायालयाने १३ मार्च रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत जयराम चाटे याला पोलीस बंदोबस्तात धार्मिक विधीसाठी उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे.
धनंजय देशमुख यांचा तीव्र विरोध
धनंजय देशमुख यांनी न्यायालयासमोर आणि प्रशासनासमोर काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. देशमुख यांच्या मते, संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे परिसरात आधीच दहशतीचे आणि तणावाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत जर मुख्य आरोपीला कोणत्याही कारणास्तव जामीन किंवा तात्पुरती रजा देऊन बाहेर सोडले, तर त्याचा परिणाम अत्यंत गंभीर होऊ शकतो.
धनंजय देशमुखांचे प्रशासनाला सवाल
“आरोपीला बाहेर सोडल्यास परिसरात पुन्हा संघर्षाची ठिणगी पडू शकते. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी प्रशासन घेणार का, आरोपी बाहेर आल्यास या प्रकरणातील महत्त्वाच्या साक्षीदारांवर दबाव टाकला जाण्याची किंवा त्यांना धमकावण्याची दाट शक्यता आहे. पीडित कुटुंबाच्या सुरक्षेचा प्रश्न या निर्णयामुळे ऐरणीवर येऊ शकतो,” असं धनंजय देशमुख म्हणाले.
