• Mon. Jun 15th, 2026

    Mumbai Crime : दादागिरीच्या वादातून 14 वर्षांच्या मित्राला संपवलं, विहार तलावात फेकलं; तीन अल्पवयीनांची कबुली, पोलिस तपासात बनावाचा पर्दाफाश

    Mumbai Crime : दादागिरीच्या वादातून 14 वर्षांच्या मित्राला संपवलं, विहार तलावात फेकलं; तीन अल्पवयीनांची कबुली, पोलिस तपासात बनावाचा पर्दाफाश

    भांडुपमध्ये ८ वीतील विद्यार्थ्याची त्याच्याच मित्रांनी हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दादागिरीच्या वादातून मित्रांनी सिद्धार्थ लोंढेची हत्या करून मृतदेह विहार तलावात फेकला.

    भांडुपमध्ये आठवीतील विद्यार्थ्याची हत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अमुलकुमार जैन, भांडुप: मुंबईतील भांडुप परिसरात घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. आठवीत शिकणाऱ्या १४ वर्षीय सिद्धार्थ अजय लोंढे याची त्याच्याच मित्रांनी मारहाण करून हत्या केल्याचे उघड झाले आहे. पुरावा लपवण्यासाठी मृतदेह विहार लेक येथे फेकण्यात आल्याची माहिती आज भांडुप पोलिसांकडून देण्यात आली. सिद्धार्थ हा तुळशेतपाडा, भांडुप (पश्चिम) येथे कुटुंबासोबत राहत होता. २२ फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे तीन वाजता तो खेळायला जात असल्याचे सांगून घराबाहेर पडला; मात्र रात्री उशिरापर्यंत परतला नाही. कुटुंबीयांनी परिसरात शोध घेतल्यानंतर भांडुप पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. तो अल्पवयीन असल्याने पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

    विहार तलावात आढळला मृतदेह

    दरम्यान, २३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी विहार तलावात एका मुलाचा मृतदेह आढळून आला. अग्निशमन दलाच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आला. सुरुवातीला बुडून मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त होत होती. मात्र शवविच्छेदन अहवालात फुफ्फुस आणि पोटात पाणी नसल्याचे, तसेच डोक्याच्या मागील बाजूस गंभीर दुखापत व अंतर्गत रक्तस्राव झाल्याचे नमूद झाल्याने हत्येचा संशय बळावला.

    दादागिरीच्या वादातून मारहाण

    तपासादरम्यान सिद्धार्थला शेवटचे त्याच परिसरातील तीन मित्रांसोबत पाहिल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता सुरुवातीला ‘पोहायला गेलो असताना तो बुडाला’ असे सांगण्यात आले. मात्र स्वतंत्र चौकशीत तिघांनीही मारहाण करून त्याला तलावात फेकल्याची कबुली दिली. दादागिरीच्या वादातून रागाच्या भरात काठीने मारहाण केल्याचे समोर आले आहे.

    तिन्ही अल्पवयीन मुलं बाल निरीक्षण गृहात

    या प्रकरणी १४ ते १५ वयोगटातील तिन्ही मुलांना ताब्यात घेऊन डोंगरी येथील बाल निरीक्षण गृहात ठेवण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे भांडुप परिसरात हळहळ व्यक्त होत असून पालकवर्गात चिंतेचे वातावरण आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा