• Fri. Mar 6th, 2026
    Mumbai Pune Expressway: अपघातानंतर मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे ठप्प; मुख्यमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांना कडक सूचना, SOP तयार होणार

    Accident News: अपघाताच्या कालावधीत वाहनचालकांकडून घेण्यात आलेला टोल परत केला जाणार असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलं आहे.

    देवेंद्र फडणवीस(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर काही दिवसांपूर्वी झालेल्या टँकर अपघाताचे पडसाद शनिवारी विधानसभेत उमटले. याची गंभीर दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महामार्गावर अशा प्रकारच्या ज्वलनशील पदार्थांची वाहतूक करणाऱ्या टँकरचा अपघात झाल्यास पुढे कोणती कार्यवाही करायची, यासंदर्भात मानक प्रणाली (एसओपी) तयार करण्याची सूचना संबंधित कंपन्यांना दिल्याची माहिती दिली.

    मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर काही दिवसांपूर्वी प्रोपेलिन या ज्वलनशील वायूचा टँकर उलटल्याने जवळपास ३२ तास महामार्ग ठप्प होता. याबाबत आमदार चेतन तुपे, अमित साटम यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरील माहिती दिली. यावेळी शिवसेना (उबाठा) पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी हॅजमॅट व्हेईकल (धोकादायक पदार्थांची वाहतूक करणारे वाहन) युनिट तसेच बोगद्यात आग लागल्यास अग्निशमन युनिट उभारण्याची मागणी केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील यांनी अशा परिस्थितीत पोलिस किंवा संबंधित यंत्रणेला घटनास्थळी पोहोचण्यासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करणे तसेच प्रवाशांना थेट माहिती पोहोचविण्याची मागणी केली.

    दरम्यान, भविष्यात अशा प्रकारच्या अपघातानंतर संबंधित टँकरला एअरलिफट करता येऊ शकते का, याची चाचणी एमएसआरडीसीच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले.

    मुख्यमंत्री काय म्हणाले?

    “अशा प्रकारची वाहतूक करणाऱ्या कंपन्यांकडे अशा स्थितीत मदत करण्याची यंत्रे नव्हती आणि एसओपीही नाही. त्यामुळे तशी एसओपी तयार करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच अशा परिस्थितीत आपण हेलिकॉप्टर वापरतो पण सूर्यास्तानंतर आपल्याकडे हेलिकॉप्टर वापरता येत नाहीत त्यामुळे त्यांच्या वापरावर मर्यादा आहेत. ‘आयटीएमएस’चा प्रभावी वापर करण्यात येईल, त्यामुळे प्रत्येक प्रवाशाला व्यक्तिगतरित्या थेट माहिती मिळत राहील, असे प्रयत्न करू,” असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा