• Fri. Mar 6th, 2026

    मध्यपूर्वेतील युद्धाचा फटका, UAE मध्ये रायगड आणि नवी मुंबईकर अडकले, हवाई हद्द बंद; प्रवाशांची धांदल

    मध्यपूर्वेतील युद्धाचा फटका, UAE मध्ये रायगड आणि नवी मुंबईकर अडकले, हवाई हद्द बंद; प्रवाशांची धांदल

    मध्यपूर्वेत सुरु असलेल्या युद्धाचा मोठा फटका आंतरराष्ट्रीय विमानसेवेला बसताना दिसत आहे. युद्धामुळे अनेक विमानांचे उड्डाण अनिश्चित काळासाठी रद्द झाले आहेत. यामुळे अनेक भारतीय UAE मध्ये विमानतळावर अडकून पडले आहेत. यामुळे रायगड आणि नीव मुंबईकरांचादेखील समावेश आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अमुलकुमार जैन, रायगड : मध्यपूर्वेत भडकलेल्या तणावाची झळ आता थेट सामान्य प्रवाशांना बसू लागली आहे. इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यात वाढलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आखाती देशांमध्ये सुरक्षेची परिस्थिती गंभीर बनली आहे. त्याचा परिणाम म्हणून अनेक देशांनी आपली हवाई हद्द तात्पुरती बंद केली असून आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द किंवा पुढे ढकलण्यात आली आहेत. या घडामोडींमुळे संयुक्त अरब अमिराती ( UAE ) येथे गेलेले रायगड आणि नवी मुंबई परिसरातील काही नागरिक सध्या तेथेच अडकून पडले आहेत.

    संघर्ष तीव्र झाल्यानंतर विमान कंपन्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून उड्डाणे स्थगित करण्याचा निर्णय घेतला. परिणामी, परतीच्या प्रवासाची तयारी करून विमानतळावर पोहोचलेले अनेक प्रवासी अचानक अनिश्चिततेत सापडले. काही जण हॉटेलमध्ये तात्पुरती व्यवस्था करून थांबले आहेत, तर काही प्रवासी विमानतळ परिसरातच परिस्थिती सुधारण्याची वाट पाहत आहेत. सोशल मीडियावरून संपर्क साधत आपल्या कुटुंबियांना धीर देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

    आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांच्या माहितीनुसार, लष्करी हालचाली आणि प्रतिहल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर आखातातील हवाई क्षेत्र अत्यंत संवेदनशील झाले आहे. इराणकडून अमेरिकन तळांना लक्ष्य केल्याच्या वृत्तांनंतर तणाव आणखी वाढल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर नागरी विमान वाहतूक सुरक्षेच्या कारणास्तव मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली आहे. भारतासह विविध देशांतील हजारो प्रवाशांच्या प्रवासावर याचा परिणाम झाला आहे.

    दरम्यान, UAE मधील भारतीय दूतावास आणि संबंधित यंत्रणा परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याची माहिती मिळत आहे. अडकलेल्या नागरिकांशी संपर्क साधून आवश्यक ती मदत पुरविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. परिस्थिती स्थिर झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने उड्डाणे पूर्ववत करण्याचे नियोजन असल्याची माहितीही समोर येत आहे.

    रायगड आणि नवी मुंबईतील कुटुंबीयांमध्ये मात्र चिंतेचे वातावरण आहे. आपल्या नातेवाईकांची सुरक्षितता आणि परतीचा प्रवास कधी सुरू होणार याबाबत सर्वांच्या नजरा अधिकृत घोषणांकडे लागल्या आहेत. केंद्र शासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. परदेशात असलेल्या भारतीयांनी स्थानिक प्रशासन आणि भारतीय दूतावासाशी संपर्कात राहावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. मध्यपूर्वेतील या युद्धजन्य परिस्थितीचे पडसाद किती काळ उमटणार, हे अद्याप स्पष्ट नसले तरी सध्या तरी प्रवाशांसाठी प्रतीक्षेचीच परीक्षा सुरू आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा