• Sat. Aug 8th, 2026

    जायकवाडीतील उपलब्ध पाण्याचे सुयोग्य नियोजन करा  – पालकमंत्री संजय शिरसाट – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Aug 8, 2026
    जायकवाडीतील उपलब्ध पाण्याचे सुयोग्य नियोजन करा  – पालकमंत्री संजय शिरसाट – महासंवाद

    छत्रपती संभाजीनगर  दि. ८ (जिमाका) : नाशिक व अहिल्यानगर परिसरात झालेल्या पावसामुळे जायकवाडी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली असून मराठवाड्यावरील संभाव्य जलसंकट टळले आहे. तथापि, धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याचा काटकसरीने आणि नियोजनबद्ध पद्धतीने वापर करावा. कृषी सिंचन, उद्योग तसेच पिण्याच्या पाण्याची भविष्यात टंचाई निर्माण होणार नाही, यासाठी जलसंपदा विभागाने जलवापराचे सुयोग्य नियोजन करावे, अशा सूचना पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आज पैठण येथे  दिल्या.

    जायकवाडी धरण १०० टक्के भरल्यानिमित्त नाथसागर जलाशयाचे पालकमंत्री शिरसाट यांच्या हस्ते आज जलपूजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. आमदार विलास भुमरे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

    याप्रसंगी महापौर समीर राजूरकर, विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, नगरसेवक हर्षदा शिरसाट, अधीक्षक अभियंता राजेंद्र धोडपकर, कार्यकारी अभियंता गणेश हासे, उपअभियंता श्रद्धा निंबाळकर, तहसीलदार ज्योती पवार, गटविकास अधिकारी मनोरमा गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील, पोलीस निरीक्षक महादेव गोमारे आदी उपस्थित होते.

    पालकमंत्री शिरसाट म्हणाले की, जायकवाडी धरण हे मराठवाड्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असून शेती, उद्योग आणि नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची मोठी गरज या प्रकल्पातून भागविली जाते. यंदा धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने समाधानाची बाब असली, तरी उपलब्ध पाण्याचा वापर अत्यंत जबाबदारीने करणे आवश्यक आहे. पाण्याचे योग्य व्यवस्थापन केल्यास आगामी काळात सिंचनासह औद्योगिक आणि पिण्याच्या पाण्याची गरज प्रभावीपणे पूर्ण करता येईल. त्यादृष्टीने संबंधित यंत्रणांनी आतापासूनच नियोजन करावे, असे त्यांनी सांगितले.

    आमदार विलास भुमरे म्हणाले की, मराठवाड्याची जीवनदायिनी असलेल्या नाथसागरात यंदा मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. जलाशयातील हा पाणीसाठा केवळ पाणी नसून शेती, उद्योग, पिण्याचे पाणी आणि मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी नवी आशा आहे. निसर्गाने दिलेल्या या अमूल्य जलसंपत्तीचे जतन आणि योग्य वापर करणे ही सर्वांची जबाबदारी आहे.

    यावेळी पालकमंत्री यांच्या हस्ते विधिवत नाथसागर जलाशयाचे जलपूजन करण्यात आले. गोदावरी नदीची साडी-चोळीने ओटी भरून श्रीफळ अर्पण करण्यात आले. जायकवाडी प्रकल्पाच्या नियंत्रण कक्ष परिसरात आयोजित या कार्यक्रमात निसर्गाने दिलेल्या जलसंपत्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

    जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने मराठवाड्यातील कृषी सिंचन, पिण्याचे पाणी आणि औद्योगिक पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने दिलासादायक परिस्थिती निर्माण झाली असून नाथसागर परिसरात समाधानाचे वातावरण आहे.

    ०००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed