• Fri. Mar 6th, 2026

    Uddhav Thackeray : ‘भावा-भावात भांडणं लावायची, संहार घडवायचा, मग गीता सांगायची’, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर घणाघात

    Uddhav Thackeray : ‘भावा-भावात भांडणं लावायची, संहार घडवायचा, मग गीता सांगायची’, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर घणाघात

    ठाकरे बंधू एकत्र येण्याचं क्रेडिट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेताना दिसतात. पण यावरुन उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात उद्धव ठाकरेंनी विंदा करंदीकरांच्या कवितेच्या ओळींचा दाखला देत फडणवीस यांना खोचक टोला लगावला.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विद्यमान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. ज्येष्ठ कवी विंदा करंदीकर यांच्या कवितेच्या ओळी म्हणत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. ‘लढवून बांधवांना संहार साधणारा, गीता खुशाल सांगे’, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना चिमटा काढला. खरं म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे दोन्ही बंधू काही महिन्यांपूर्वी एकत्र आले. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत दोन्ही भावांच्या पक्षाची युती झाली. तसेच मराठी भाषेच्या मुद्द्यावरुन दोन्ही भावांचे विचार जुळले आणि त्यानंतर दोन्ही भाऊ एकत्र आलेले बघायला मिळाले. मराठीच्या मुद्यावरुन दोन्ही भावांचा एकत्र मेळावा देखील पार पडला होता.

    महाराष्ट्रात इयत्ता पहिलीपासून मराठी, इंग्रजीसोबत हिंदी भाषेच्या शिक्षणाची सक्ती करण्यात येणार होती. पण या त्रिभाषिक धोरणाला मनसे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून कडाडून विरोध करण्यात आला होता. याच मुद्द्यावरुन दोन्ही भाऊ एकत्र आले आणि त्यानंतर दोन्ही भावांची राजकीय युतीदेखील पुढे झाली. दोन्ही बंधू एकत्र येण्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कारणीभूत असल्याचं ठाकरे बंधू याआधी म्हणाले होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ते मान्य करण्यात आलं आणि त्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनातही नुकतंच आपल्यामुळे ठाकरे बंधू एकत्र आल्याचं वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यावरुन उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना खोचक टोला लगावला. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात उद्धव ठाकरे बोलत होते.

    “मराठी दिन म्हणायचं म्हणजे हा एकच दिवस असतो, पण आपण सर्वजण मराठी बोलणारे मराठी आईचे मुलं आहोत. त्यामुळे आपल्यासाठी रोजच मराठी भाषा दिवस असलाच पाहिजे किंवा मराठी भाषा असलीच पाहिजे. एक अप्रतिम कार्यक्रम आपण अनुभवला, जादूची पेटी. आपल्या आयुष्यात मतपेटी आहे. राजकारण्यांच्या थापा आपण रोजच बघतोय, पण ढोलकीवरची थाप विरळ होत चाललीय”, अशी भावना उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

    ठाकरेंचा फडणवीसांवर प्रहार

    “आम्ही कोणत्याही भाषेचा द्वेष करत नाहीत. पण आमच्यावर जबरदस्ती करु नका एवढीच आमची जोपर्यंत ऐकताय तोपर्यंत नम्र विनंती आहे. दीपकजी तुम्ही बोलता-बोलता म्हणालात की, माझा राग आला तरी चालेल. पण हल्ली मला पवारांचा राग नाही येत. पण तुम्ही मराठीसाठी बोलत आहात. शिवसेनेचा जन्मच मराठी माणसाच्या न्याय हक्कांसाठी लढणारी संघटना म्हणून झालेला आहे. त्यामुळे मराठीसाठी आम्ही दोघे भाऊ एकत्र आलो. आता मुख्यमंत्री त्याचं क्रेडिट घेत आहेत की, दोन बंधूंना आम्ही एकत्र आणलं. विंदा करंदीकरांची एक कविता आहे. त्यातील दोन कडवे आहेत. लढवून बांधवांना संहार साधणारा गीता खुशाल सांगे, त्याला इलाज नाही. आधी भांडवायचं, भांडणं लावायची आणि नंतर आम्हीच सगळं केलं. भावा-भावात भांडणं लावायची, संहार घडवायचा, मग गीता सांगायची, त्याचा उपयोग काय? त्याला इलाज तरी काय?”, अशा शब्दांत ठाकरेंनी टोला लगावला.

    “जसं आम्हाला दोघे भावांना एकत्र आणलं तसं तिकडे तुम्ही काही एकत्रिकरण करता आहात का? ज्या सध्या काही बातम्या चालू आहेत, विलीन होणार म्हणून, तसं काही करत आहात का? लोकं वाट बघत आहेत. नाहीतर कशाला या फुकटच्या गोष्टी करताय. कशाला नसत्या गोष्टीचं श्रेय घेताय”, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा