• Fri. Mar 6th, 2026
    Kalyan News: कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांचा हैदोस सुरूच! रेबीजच्या भीतीने तरुणाचा मृत्यू, आता ७ वर्षांच्या चिमुकल्याचा बळी, काय घडलं?

    कल्याणात भटक्या कुत्र्यांची दहशत जीवघेणी ठरत आहे. मोहने-गाळेगाव परिसरात ७ वर्षांच्या खुशील वाघे या चिमुरड्याचा कुत्रा चावल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून…

    कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यामुळे ७ वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू.(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    प्रदिप भणगे, कल्याण: कुत्रा चावणे ही घटना किती भयंकर असते. यामुळे मोठी व्यक्तीसुद्धा प्रचंड घाबरुन जाते. जेव्हा कुत्रा हल्ला करतो तेव्हा लहान मुलाचं काय झालं असेल, याचा विचारही करवत नाही, कारण अशीच एक भयानक अन् गंभीर घटना कल्याणमध्ये घडली आहे. कल्याणमध्ये एका केवळ ७ वर्षीय लहानग्यावर भटक्या कुत्र्याने हल्ला करत त्याला चावा घेतला होता. दरम्यान, भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याने रेबीजची लक्षणे दिसू लागतील, या भीतीने कल्याण पूर्वेतील एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच, आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कल्याणजवळील मोहने-गाळेगाव परिसरात एका सात वर्षांच्या चिमुरड्याचा भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. खुशील शंकर वाघे असे या दुर्दैवी मुलाचे नाव असून, तो मोहनेनजीकच्या गाळेगाव परिसरातील कातकरी पाड्यात राहत होता.

    नेमकी घटना काय?

    मिळालेल्या माहितीनुसार, खुशीलला भटका कुत्रा चावला होता. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. ज्यावेळी खुशीलला कुत्र्याने चावा घेतला, त्याच वेळी एका दुसऱ्या मुलावरही कुत्र्याने हल्ला केला होता. हा मुलगा जखमी असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या घटनेची गंभीर दखल घेत शिवसेना (ठाकरे गट) नगरसेविका तेजश्री गायकवाड यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयात जाऊन आयुक्त आणि महापौरांची भेट घेतली व त्यांना निवेदन दिले.

    भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला

    बल्याणी चौक, उंभार्णी, मोहिली, गाळेगाव, जेतवननगर, तिपन्नानगर, आर. एस. टेकडी आणि मोहने परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. हे कुत्रे रस्त्यावरून येण्या-जाणाऱ्या नागरिकांच्या अंगावर धावून जातात. भटक्या कुत्र्यांच्या या वाढत्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेक नागरिक जखमी होत असून, पालिकेने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

    Maharashtra TimesBuldhana Crime : जुना वाद विकोपाला गेला, पाच जणांनी अनिकेतला शेतात गाठलं, निर्घृणपणे संपवलं; पोलिसांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या

    नगरसेविकेची मागणी

    भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी विशेष पथक आणि गाडी तैनात करण्यात यावी, तसेच त्यांचे निर्बीजीकरण व लसीकरण करण्यात यावे, अशा मागण्या नगरसेविका गायकवाड यांनी महापालिका प्रशासनाकडे केल्या आहेत.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा