केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या निकालावर प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी प्रभाग रचना रद्द करण्याची मागणी केली. तसेच आपली मागणी मान्य झाली नाही तर आपण कोर्टात जाऊ, असा इशारा दिला आहे.
दोन दिवसांपासून मराठवाडा दौऱ्यावर असलेले केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले शुक्रवारी छत्रपती संभाजीनगर शहरात जागतिक बौध्द धम्म परिषदेला उपस्थित राहिले. त्यापूर्वी सुभेदारी विश्रामगृह येथे त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. “लातूर जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालयात कर्मचाऱ्यांनी चोरीचा आळ घेऊन केलेल्या मारहाणीनंतर विद्यार्थिनीने गळफास घेतला. तिला दलित म्हणून मारहाण केल्याचा आरोप आहे. तिने आत्महत्या केली नसून फाशी दिल्याचे तिच्या आईने सांगितले. औसा तालुक्यातील एका गावात तिच्या कुटुंबियांची भेट घेऊन मदतीचे आश्वासन दिले. तसेच पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन सत्यस्थिती जाणून घेतली. या प्रकरणात सीआयडी चौकशीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे”, असे आठवले यांनी सांगितले.
बिहार राज्यातील गया येथील महाविहार ट्रस्टवर १९४९ च्या कायद्यानुसार चार बौद्ध, चार हिंदू आणि अध्यक्षपदी जिल्हाधिकारी असतात. मात्र, ट्रस्टवर सर्व बौद्ध असावेत, अशी आमची मागणी आहे. याबाबत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांची भेट घेतली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन दिले आहे, असे आठवले यांनी सांगितले.
उत्तम प्रशासक असलेल्या अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी राज्य सरकारने केंद्राकडे केली असून त्यानुसार चौकशीचा निर्णय होईल. आमदार रोहीत पवार, अमोल मिटकरी यांनी विमान कंपनीवर संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणात घातपात असावा का? याची चौकशी करावी. मात्र, राजीव गांधी यांच्या हत्येप्रमाणे पवार यांची हत्या झाली असे वाटत नाही, असे रामदास आठवले म्हणाले.
येत्या तीन एप्रिल रोजी राज्यसभा सदस्यत्वाचा कार्यकाळ संपणार आहे. पण, तिसऱ्यांदा आपली राज्यसभेवर निवड होईल याची खात्री आहे. आणखी सहा वर्ष मिळाल्यास जोमाने काम करू, असे आठवले यांनी सांगितले. यावेळी प्रदेशाध्यक्ष बाबूराव कदम, जिल्हाध्यक्ष विजय मगरे, बाळकृष्ण इंगळे, किशोर थोरात आदी उपस्थित होते.
‘एसआयआर’ योग्यच
देशातील पाच राज्यात लवकरच निवडणुका आहेत. त्यापूर्वी ‘एसआयआर’ प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. मतदारयादी पारदर्शक ठेवण्यासाठी त्याची गरज होती. ‘एसआयआर’ला विरोध करणाऱ्या ममता बॅनर्जी आणि राहुल गांधी यांच्याशी सहमत नाही. इतर राज्यात ‘रिपाइं’ला संधी आहे, मात्र महाराष्ट्रात मित्रपक्ष संधी देत नाही, असा खेद आठवले यांनी व्यक्त केला.
