कर्जतच्या तुंगी गावात १२ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. सुरक्षा उपाययोजनांच्या अभावामुळे हा बळी गेल्याचा आरोप करत संतप्त ग्रामस्थांनी कारवाईची मागणी केली आहे.
तुंगी हे डोंगराळ व दुर्गम गाव अनेक वर्षे मूलभूत सुविधांपासून वंचित होते. अलीकडेच येथे रस्ता व वीज पोहोचली असून पाणीटंचाई दूर करण्यासाठी जलजीवन मिशनअंतर्गत तलावाचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, या तलावात सुमारे १५ फूट पाणी साचलेले असतानाही परिसरात कोणतेही सुरक्षा कठडे, इशारा फलक किंवा संरक्षक जाळी उभारण्यात आली नव्हती, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ठिकठिकाणी सुरू असलेले खोदकाम आणि निसरडी पायवाट यामुळे हा परिसर अधिक धोकादायक बनला होता.
दि. २१ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास ओंकार हा गावालगतच्या तलाव परिसरात गेला होता. सायंकाळपर्यंत तो घरी परतला नसल्याने कुटुंबीयांनी त्याची शोधाशोध सुरू केली. रात्री उशिरापर्यंत कोणतीही माहिती न मिळाल्याने चिंता अधिकच वाढली. अखेर दि. २२ फेब्रुवारी रोजी सकाळी त्याचा मृतदेह तलावात आढळून आला. या घटनेने आसवले कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Ambadas Danve : ‘ड्रायव्हरच्या नावे 1150 कोटी रुपये हडपण्याचा भुमरेंचा डाव’; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप
घटनेनंतर तुंगी गावात शोककळा पसरली असून ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. “इशारा फलक नाही की कठडे नाहीत; अशा निष्काळजीपणामुळेच १२ वर्षांच्या मुलाचा जीव गेला,” असा आरोप नागरिकांनी केला. संबंधित ठेकेदार व यंत्रणेवर कारवाईची मागणी करत संतप्त ग्रामस्थांनी नेरळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर घेराव घालून निषेध नोंदवला.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे. प्राथमिक चौकशीत कामाच्या ठिकाणी सुरक्षाविषयक उपाययोजनांचा अभाव असल्याचे समोर येत असल्याची चर्चा आहे. मात्र, अधिकृत अहवालानंतरच नेमकी जबाबदारी निश्चित होणार आहे.
Solapur Crime : पोलीस पत्नीवर संशय, घटस्फोटाचा राग; जावयाने शेतातच सासऱ्याला निर्घृणपणे संपवलं
जलजीवन मिशनसारख्या महत्त्वाकांक्षी योजनेतून ग्रामीण भागाला शुद्ध पाणीपुरवठा करण्याचा उद्देश असताना, अशा दुर्घटनांमुळे या योजनांच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. विकासकामे सुरू असताना सुरक्षिततेचे नियम काटेकोरपणे पाळणे आवश्यक असते, मात्र येथे त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र दिसत आहे.
तुंगीतील या दुर्घटनेने केवळ एक कुटुंब उद्ध्वस्त झाले नाही, तर संपूर्ण गावाला वेदना दिल्या आहेत. दोषींवर कठोर कारवाई करून भविष्यात अशा घटना टाळाव्यात, अशी ठाम मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. प्रशासनाने तत्काळ जबाबदारी निश्चित करून सुरक्षा उपाययोजना राबवाव्यात, अन्यथा आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.
