दुचाकी वाहनांच्या टाकीतील पेट्रोल, ऑइल आणि जमिनीवर थापलेल्या शेकडो गोवऱ्यांमुळे आग वेगाने वाढली. त्यामुळे आगीचे लोट दोन किलोमीटरपर्यंत उंच गेले होते. येरवड्यापाठोपाठ नायडू आणि धानोरी अग्निशमन केंद्रांच्या वाहनांनी घटनास्थळी दाखल होऊन आगीवर पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. मात्र, आगीत पन्नासहून अधिक दुचाकी वाहने जळून खाक झाली. अग्निशमन अधिकारी सोपानदेव पवार आणि जवानांनी आग आटोक्यात आणली.वाहने नेमकी कोणाची?
आगीत भक्ष्यस्थानी पडलेल्या वाहनांमध्ये काही ‘महाराष्ट्र शासन’ लिहिलेली चारचाकी वाहने आहेत. त्यामुळे ही वाहने राज्य उत्पादन शुल्क विभागाची आणि जप्त केलेली वाहने असल्याचा कयास होता; पण उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन ही वाहने विभागाची नसल्याचे स्पष्ट केले. तत्पूर्वी येरवडा वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आग लागलेली वाहने विभागाची नसल्याचे सांगून निघून गेले. त्यामुळे आगीत नुकसान झालेली वाहने नेमकी कोणाची, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अजूनही त्या ठिकाणी जप्त केलेल्या रिक्षा लावलेल्या आहेत. संबंधित विभागांनी लावलेली वाहने तातडीने काढून घ्यावी अशी मागणी शेजारी राहणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे.