मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘या वर्षी दादांनी १२वा अर्थसंकल्प मांडला असता. पुढच्या वर्षी १३वा मांडून बॅ. शेषराव वानखेडे यांच्या विक्रमाची बरोबरी केली असती. वित्त विभागाने लाडकी बहीण योजनेचा भार पडेल असे म्हटले होते; पण दादांनी ती योजना मंत्रिमंडळासमोर आणली. एका सच्च्या मित्राचा असा मृत्यू होणे, ही अंत:करणाला वेदना देणारी गोष्ट आहे. ही पोकळी भरून काढणे केवळ अशक्य आहे.’
सुनेत्रावहिनींनी अजितदादांचे कार्य पुढे नेण्याचा निश्चय केला आहे. त्याही दादांसारखी प्रतिमा निर्माण करतील, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. ‘आम्हाला २०१९मध्ये सरकार बनवायचे होते. दादांच्या वरिष्ठांनी तो निर्णय बदलवला. पण दादांनी भूमिका घेतली, मी शब्द दिला आहे तो मोडणार नाही. मग आम्ही शपथ घेतली. त्यांना त्याची किंमत मोजावी लागली,’ असेही फडणवीस म्हणाले.
अजित पवारांच्या आठवणी सांगताना रोहित पवार यांचा कंठ दाटून आला. आपल्या शर्टचे वरचे बटण उघडे असायचे. त्यावर ते बटण लावत जा, असे अजित पवार म्हणायचे. पण, चाळीस-पन्नास वर्षांनंतर कधी दादांची वर भेट होईल त्या वेळी आपण त्यांच्यासमोर हे बटण लावू. तोपर्यंत हे बटण तसेच उघडे राहील, त्यामुळे दादांची रोज आठवण येईल,’ अशा शब्दांत रोहित यांनी भावना व्यक्त केल्या.
सुनेत्रा पवार यांना अश्रू अनावर
सभागृहातील नेतेमंडळींचे भाषण ऐकताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या डोळ्यांतून नकळतपणे सतत अश्रू ओघळत होते. अजित पवारांच्या आठवणींनी सुनेत्रा पवार भावूक झाल्याचे चित्र सभागृहात दिसले.