• Fri. Mar 6th, 2026
    Mumbai Mayor : मुंबईच्या महापौरपदाबाबत नव्या चर्चांना उधाण, नेमक्या चर्चा काय?

    मुंबई महापालिका निवडणुकीत महापौर पदाचा ट्विस्ट काही केल्या संपताना दिसत नाही. महापौरपदी भाजपच्या रितू तावडे यांची निवड झाली असली तरी त्यांना केवळ सव्वा महिनेच ही जबाबदारी मिळेल, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे. भाजप आणि शिवसेनेत महापौरपदाबाबत सव्वा-सव्वा वर्षांचा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा होत आहे. याबाबतचे वृत्त माध्यमांनी प्रसारित केल्यानंतर आणखी वेगळी चर्चा समोर आली आहे. भाजपचा महापौर पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल, अशी देखील चर्चा समोर येत आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : मुंबईचा महापौर, स्थायी समिती, शिक्षण समिती किंवा विविध समितींच्या अध्यक्षपदाबाबत राजकारणात वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. कारण मुंबईच्या महापौर पदाबाबत भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सव्वा-सव्वा वर्षांचा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा आहे. तसेच इतर समित्यांच्या अध्यक्षपदाबाबतही असाच फॉर्म्युला ठरल्याची चर्चा आहे. मुंबईच्या महापौर पदाच्या निवडणुकीनंतर समोर आलेल्या या वृत्तानंतर मुंबई महापालिकेतला निवडणुकीचा ट्विस्ट अजून संपलेला नाही हे स्पष्ट होताना दिसत आहे. विशेष म्हणजे याबाबतचे वृत्त समोर आल्यानंतर आता भाजपचाच महापौर पाच वर्षे राहणार अशी देखील माहिती सूत्रांनी दिल्याचं एका वृत्त वाहिनीने दिलं आहे.

    मुंबई महापालिका निवडणूक अत्यंत चुरशीची बघायला मिळाली. ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे या निवडणुकीला अतिरंजक वळण लागलं होतं. प्रत्येक पक्षाची धाकधूक वाढली होती. अशा या चुरशीच्या निवडणुकीचा ऐतिहासिक निकाल लागला. 30 वर्षांपासून ठाकरेंच्या ताब्यात असणारी मुंबई महापालिका त्यांच्या हातून निसटली. भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या महायुतीला इथे मोठं यश आलं. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. त्यानंतर भाजप आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना यांच्यात महापौर पदावरुन रस्सीखेच सुरु असल्याचं बघायला मिळालं.

    मुंबई महापालिका निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांनी आपल्या शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांना मुंबईतील पंचतारांकीत हॉटेलमध्ये ठेवलं. यानंतर काही दिवसांनी भाजप आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी आपापल्या गटाची नोंद केली. तसेच भाजपच्या रितू तावडे या मुंबई महापालिकेच्या महापौर पदी विराजनाम झाल्या. तर संजय घाडी यांची शिवसेनेच्या उपमहापौरपदी वर्णी लागली. महापौर निवडणुकीनंतर आता याबाबतचे सर्व सस्पेन्स संपले असतील, असं वाटत असतानाच आता नवी चर्चा उदयास आली आहे.

    सव्वा-सव्वा वर्षाचा फॉर्म्युला?

    मुंबई महापालिकेच्या महापौर पदाबाबत आता महायुतीत एकमत झाल्याची नवी माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे मुंबई महापालिकेत पहिले सव्वा वर्षे मुंबईचा महापौर राहणार असल्याची माहिती आहे. यानंतर पुढचे सव्वा वर्षे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा महापौर बसणार असल्याची चर्चा आता समोर आहे. विविध माध्यमांनीदेखील सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे. पण हे वृत्त समोर आल्यानंतर पाच वर्षे भाजपचाच महापौर असेल, असं वेगळ्या सूत्रांनी सांगितल्याचं वृत्त देखील देण्यात आलं आहे. तसेच असं असेल तर जिथे शिवसेनेचा महापौर असेल तिथे भाजप सव्वा वर्षांनी दावा करेल, असंही सूत्रांनी सांगितल्याचं वृत्त माध्यमांकडून देण्यात आलं आहे.

    दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात 29 जानेवारीला महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत सर्व महापालिकांमधील तिढा सुटल्याची माहिती आता समोर येत आहे. मुंबई आणि इतर महापालिकांमध्ये महायुतीचा तिढा सुटत नसल्याने महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत चर्चेच्या मार्गातून सर्व महापालिकांचा तिढा सुटल्याची चर्चा आहे. या बैठकीत समितींच्या अध्यक्षपदांचा देखील फॉर्म्युला ठरला आहे. महायुतीत समन्वय राहावा यासाठी दोन्ही पक्षांनी समंजसपणाची भूमिका घेतल्याची माहिती समोर येत आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा