• Sun. Mar 8th, 2026

    Mumbai Pune Missing Link: मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’बाबत मिलिंद नार्वेकरांची मुख्यमंत्र्यांकडे महत्त्वाची मागणी; धोका टाळण्यासाठी सुचवले उपाय

    Mumbai Pune Missing Link: मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’बाबत मिलिंद नार्वेकरांची मुख्यमंत्र्यांकडे महत्त्वाची मागणी; धोका टाळण्यासाठी सुचवले उपाय

    Shivsena Milind Narvekar: ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प प्रवाशांसाठी खुला झाल्यानंतर किमान पहिले 6 महिने या मार्गावरून केवळ प्रवासी वाहतूक सुरू करावी, अशी मागणी नार्वेकरांनी केली आहे.

    मुंबई–पुणे ‘मिसिंग लिंक’बाबत मिलिंद नार्वेकरांची मुख्यमंत्र्यांकडे महत्त्वाची मागणी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाची प्रवाशांना प्रतीक्षा असून या मार्गामुळे मुंबई आणि पुणे या दोन महत्त्वाच्या शहरांतील अंतर आणखी कमी होण्यास मदत होणार आहे. या प्रकल्पाबाबत आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी महत्त्वाची मागणी केली आहे. सर्व प्रकारच्या तांत्रिक चाचण्या आणि अनुषंगिक कामे पूर्ण करून वाहतुकीसाठी मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प खुला करावा, घाईघाईत हा प्रकल्प सुरू करू नये, अशी मागणी विधान परिषदेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष अनिल गायकवाड यांना लिहिलेल्या पत्रातून केली आहे. या संदर्भात त्यांनी पत्र पाठवून काही सूचनाही केल्या आहेत.

    मुंबई–पुणे प्रवासाचा कालावधी कमी करण्यासाठी आणि वाहतूककोंडी कमी करण्याच्या उद्देशाने मिसिंग लिंक हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवण्यात येत असून एप्रिल 2026 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होऊन वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी प्रकल्पाच्या तांत्रिक बाबींची काटेकोर अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

    सध्या द्रुतगती मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढली असून, विशेषतः अवजड वाहनांमुळे घाट विभागात वारंवार कोंडी निर्माण होते. त्यामुळे ‘मिसिंग लिंक’ सुरू झाल्यानंतर किमान पहिले सहा महिने फक्त प्रवासी वाहतूक या मार्गावरून सुरू करून अवजड वाहनांची वाहतूक जुन्या मार्गावरूनच सुरू ठेवण्याचा विचार करावा, असं आमदार मिलिंद नार्वेकर यांनी सुचवलं आहे. ज्वलनशील व धोकादायक रसायने वाहून नेणाऱ्या वाहनांना मिसिंग लिंक मार्गावरून कधीही प्रवेश देऊ नये, अशी मागणीही त्यांनी लिहिलेल्या पत्रात करण्यात आली आहे.

    ‘सुरक्षेला प्राधान्य द्यावं’

    मिसिंग लिंकबाबतच्या सूचनांचा गांभीर्याने विचार करून नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, अशी विनंती नार्वेकर यांनी सरकारला केली आहे.

    दरम्यान, मिलिंद नार्वेकर यांच्या या मागण्यांबाबत सरकार आणि प्रशासनाकडून काय कार्यवाही केली जाते, नार्वेकर यांच्या सूचनांना सकारात्मक प्रतिसाद दिला जातो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा