मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडी फोडून काढण्यासाठी आता प्रशासनाने महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. अपघातग्रस्त टँकरमधील गॅस ट्रान्सफर करण्यसाठी दुसरा टँकर घटनास्थळी आणण्यात आला आहे. पण हे काम वाटतं तितकं सोपं नाही. त्यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर आहे.
आडोशी बोगद्याजवळ पलटी झालेल्या टँकरमधील गॅस ट्रान्सफर करण्यासाठी दुसरा टँकर घटनास्थळी दाखल करण्यात आला आहे. गॅस ट्रान्सफर करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. याआधीदेखील अपघातग्रस्त टँकर बाजूला करण्याचे प्रयत्न करण्यात आले होते. पण त्यात प्रशासनाला यश आलं नव्हतं. अखेर घटनास्थळी दुसरा केमिकल टँकर आणण्यात आला आहे. या टँकरमध्ये आता गॅसचं ट्रान्सफर केलं जाणार आहे.
अपघातग्रस्त टँकरमधून दुसऱ्या टँकरमध्ये गॅस ट्रान्सफरची प्रक्रिया आता केली जाणार आहे. सध्या अपघातग्रस्त टँकरमधील प्रोपिलीन गॅस हळूहळू आणि अत्यंत काळजीपूर्वक दुसऱ्या टँकरमध्ये हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत टँकर हलवणे धोकादायक असल्याने तीव्र खबरदारी घेतली जात आहे. या दरम्यान कोणतीही ठिणगी निर्माण होऊ नये म्हणून विद्युत पुरवठा, वाहनांची हालचाल व मानवी वर्दळ पूर्णतः नियंत्रित ठेवण्यात आली आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव मुंबईकडे जाणारी वाहतूक तात्काळ पूर्णतः बंद करण्यात आली, तर पुण्याकडील वाहतूक मर्यादित स्वरूपात सुरू ठेवण्यात आली.
टँकर अपघातामुळे एसटीच्या 139 फेऱ्या रद्द
दरम्यान, पुणे–मुंबई एक्सप्रेस वेवर झालेल्या टँकर अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली असून या घटनेचा परिणाम महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस सेवांवर झाला आहे. परिवहन विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, या अपघातानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे राज्यातील विविध विभागांमधील एकूण 139 बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या. यामध्ये 73 ई-शिवनेरी आणि 66 इतर बस फेऱ्यांचा समावेश आहे.
तसेच, या एक्सप्रेस वेवर महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाची एकूण 163 वाहने वाहतूक कोंडीत अडकली होती. यामध्ये सातारा विभागातील 46, सोलापूर विभागातील 36, पुणे विभागातील 20, सांगली विभागातील 18, कोल्हापूर विभागातील 13, पालघर विभागातील 12, ठाणे विभागातील 11 आणि मुंबई विभागातील 7 वाहनांचा समावेश आहे.
प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असून, परिस्थितीचा आढावा घेऊन पर्यायी व्यवस्था उभारण्यात आल्या आहेत. वाहतूक सुरळीत होताच बस सेवा टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्यात येतील, असे महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने कळविले आहे.
पोलिसांकडून माणुसकीचं दर्शन
या अपघातामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर अनेक तासांपासून वाहनं स्थानबद्ध झाले आहेत. अनेक वाहनं हे 20 ते 22 तासांपासून एकाच ठिकाणी आहेत. या वाहनांमधील प्रवाशांना पाणी आणि अन्न मिळणंही कठीण झालं होतं. अशा परिस्थितीत पुणे पोलीस हे देवदूत ठरले आहेत. पुणे पोलिसांकडून वाहतूक कोंडीत अडकलेल्या प्रवाशांना बिस्किटांचे पाकीट आणि पाण्याच्या बाटल्यांचं वाटप केलं जात आहे. पोलिसांकडून केलं जात असलेल्या या मदत कार्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलही होत आहेत.
