मुंबई
आपल्या पक्षाला योग्य जागा मिळाल्या नाहीत. मिळालेल्या अनेक जागांवर शिवसेना उबाठाकडून मदत झाली नाही. अनेक ठिकाणी अपक्ष उमेदवार उभे करण्यात आले. त्याचा फटका मनसेच्या उमेदवारांना बसला, असा तक्रारींचा पाढाच मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी वाचला. राज ठाकरेंनी या सगळ्या तक्रारी ऐकून घेतल्या. आता कोणत्याही तक्रारी नको. अधिक वेगानं आणि अधिक जोमानं कामाला लागा, अशा सूचना राज ठाकरेंनी केल्याचं वृत्त एबीपी माझानं दिलं आहे.
दुसरीकडे राज ठाकरेंची मनसे मुंबईत भाजपला पाठिंबा देणार असल्याची चर्चा सुरु झाली. कल्याण-डोंबिवलीत शिवसेना उबाठासोबत युतीत लढलेल्या मनसेनं निकाल लागताच शिंदेसेनेला पाठिंबा दिला आणि सत्तेत जाण्याची तयारी केली. त्यानंतर राज ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त केलेल्या पोस्टमध्ये लवचिक निर्णयांचा उल्लेख होता. त्यातच मुंबईत मनसे भाजपला पाठिंबा देणार असल्याच्या चर्चेनं वेग घेतला. यावर खुद्द राज ठाकरेंनी भाष्य केलं. आम्ही भाजपला पाठिंबा देणार नाही, हे मी स्वत: सांगतोय, असं म्हणत राज यांनी राजकीय चर्चांना पूर्णविराम दिला.