मुंबई
उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांच्याकडील खाती जाहीर करण्यात आली आहेत. अजित पवार यांच्याकडे असलेली खाती सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्यात आलेली आहेत. याला केवळ अर्थ खात्याचा अपवाद आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थ मंत्रालयाचा प्रभार स्वत:कडे ठेवला आहे. राज्याचा अर्थसंकल्प मार्च महिन्यात सादर केला जाणार आहे. तोपर्यंत अर्थ खात्याची जबाबदारी फडणवीस यांच्याचकडे राहण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांनी काल मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. अजित पवार यांच्याकडील अर्थ आणि नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, अल्पसंख्याक विकास, क्रीडा आणि युवक कल्याण ही खाती पक्षाकडे कायम राहावीत, अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी फडणवीस यांच्याकडे केली होती.
सध्याच्या घडीला अर्थ खातं मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्याकडे ठेवलं आहे. मार्च महिन्यात सादर होणारा अर्थसंकल्प फडणवीसच मांडतील, अशी शक्यता आहे. काल त्यांनी यावर भाष्य केलं. अजित पवारांनी अर्थ मंत्री म्हणून अर्थसंकल्पावर काम सुरु केलं होतं. त्यांनी अर्थसंकल्पासाठी बरीच तयारीदेखील केली होती. त्यात मी उद्यापासून लक्ष घालेन, असं फडणवीस म्हणाले होते. त्यामुळे आगामी अर्थसंकल्प फडणवीसच सादर करतील, हे जवळपास निश्चित मानलं जात आहे.