नागपूर
शिक्षण हे विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याचा पाया मानले जाते. शाळा म्हणजे ज्ञान, संस्कार आणि सुरक्षिततेचे मंदिर असते. मात्र नागपूर शहरातून समोर आलेल्या एका धक्कादायक घटनेने या संकल्पनेलाच तडा दिला आहे. सातवीत शिकणाऱ्या १३ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीला किरकोळ कारणावरून शिक्षिका आणि शाळेच्या मुख्याध्यापकांनी बेदम मारहाण केल्याचा गंभीर आरोप समोर आला असून, या घटनेमुळे संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
बेदम मारहाण
या प्रकारानेही समाधान न झाल्याने पुढे आणखी धक्कादायक घटना घडली. शाळेच्या मुख्याध्यापिका नासरीन अख्तर यांनी विद्यार्थिनीला कार्यालयात बोलावून घेतले. तेथे स्टीलच्या स्केलने तिच्या हात-पायांवर बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत विद्यार्थिनीला गंभीर दुखापती झाल्या असून ती मानसिक धक्क्यात गेली आहे. शाळेत सुरक्षित असल्याची भावना पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचे पीडित कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
पीडितेच्या वडिलांनी सुरुवातीला शाळा प्रशासनाकडे तक्रार दाखल केली. मात्र कोणतीही ठोस कारवाई न करता प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप केला. अखेर २५ जानेवारी रोजी त्यांनी १०९८ चाइल्ड हेल्पलाईनवर तक्रार नोंदवली. चाइल्ड हेल्पलाईनच्या पथकाने तात्काळ दखल घेत विद्यार्थिनीचा जबाब नोंदवला व समुपदेशन केले. २६ जानेवारी रोजी पीडित विद्यार्थिनीची वैद्यकीय तपासणी नागपूरच्या मेयो रुग्णालयात करण्यात आली.
गुन्हा दाखल
तपासणीत मारहाणीच्या जखमा स्पष्ट झाल्या. त्यानंतर २७ जानेवारी रोजी पोलिसांनी संबंधित शाळेचे सीसीटीव्ही फुटेजही जप्त केले आहे. या प्रकरणी यशोधरा नगर पोलीस ठाण्यात बाल न्याय (बालकांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ मधील कलम ७५, भारतीय न्याय संहितेतील विविध कलमे तसेच आरटीई कायदा २००९ मधील कलम १७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिक्षणाच्या नावाखाली मुलांवर होणाऱ्या शारीरिक व मानसिक अत्याचारांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिक, पालक आणि सामाजिक संघटनांकडून केली जात आहे.