• Sun. Mar 15th, 2026

    महिलेला बुडताना पाहिले अन् थेट मारली नदीत उडी, धाडसी पोलिसामुळे महिलेला मिळाले जीवदान

    ByMH LIVE NEWS

    Jan 27, 2026
    महिलेला बुडताना पाहिले अन् थेट मारली नदीत उडी, धाडसी पोलिसामुळे महिलेला मिळाले जीवदान

    कोल्हापूर

    कोल्हापूर शहरातील पंचगंगा नदीत बुडणाऱ्या महिलेला लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल गौतम कांबळे यांनी प्रसंगावधान राखून वाचवले. डायल 112 वरून मिळालेल्या इमर्जन्सी कॉलनुसार घटनास्थळी धाव घेतल्यानंतर त्यांनी कोणताही विलंब न करता नदीत उडी घेऊन महिलेला बाहेर काढले. या धाडसी कृतीमुळे मोठा अनर्थ टळला असून, गौतम कांबळे यांच्यावर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

    शिवाजी पुलाखाली घडली घटना

    रविवारी (25 जानेवारी रोजी) सकाळच्या वेळी शिवाजी पुलाखाली पंचगंगा नदीपात्रात एका महिलेचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती कंट्रोल रूमला मिळाली. लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे चार्ली पथक तात्काळ घटनास्थळी धावले. नदीच्या मध्यभागी 30-35 मीटर अंतरावर तरंगणाऱ्या महिलेची हालचाल पोलिसांनी लक्षात घेतली. शहनाज रफिक शेख (वय 34, राहणार अमर पार्क, जरगनगर) असे सदर महिलेचे नाव आहे. स्थानिक नागरिकांनीही या घटनेची माहिती पोलिसांना दिली होती. सीपीआर पोलीस चौकीत या घटनेची नोंद झाली असून, स्मशानभूमीच्या मागील बाजूस ही घटना घडली.

    बूट, बेल्ट बाजूला ठेवून पाण्यात उडी

    अवघ्या पाच मिनिटांत पोलिस कॉन्स्टेबल गौतम कांबळे, सौरभ कोळी आणि सी. बी. लोहार हे नदीकाठावर पोहोचले. नागरिकांनी हात दाखवून महिलेचे स्थान निदर्शनास आणले. इतक्यात महिलेच्या हातांची हालचाल दिसताच ती जिवंत असल्याचे स्पष्ट झाले. गौतम कांबळे यांनी तत्काळ बूट, कमरेचा बेल्ट आणि मोबाईल बाजूला काढून पाण्यात उडी मारण्याचा निर्णय घेतला. दोरी किंवा इनर शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु काही मिळाले नसल्याने त्यांनी आजूबाजूच्या एका व्यक्तीला सोबत घेऊन नदीत पोहून महतकार्य केले. महिलेपर्यंत पोहोचून त्यांनी महिलेला खेचत बाहेर काढले.

    पाण्यात बराच वेळ राहिल्याने थंडीने गारठलेल्या शहनाजला तात्काळ 108 रुग्णवाहिकेद्वारे सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या तिची प्रकृती स्थिर आहे.

    मानवतावादी वृत्तीची प्रेरणा आई-वडिलांकडून

    राधानगरी तालुक्यातील मोहडे गावचे गौतम कांबळे हे 2011 मध्ये मुंबई पोलीस दलात भरती झाले. 2019 मध्ये कोल्हापूरात परत आले आणि राजारामपुरी पोलीस ठाण्यातील कार्यकाळानंतर लक्ष्मीपुरी ठाण्यात रुजू झाले. नेहमीच मदतीला धावणारे गौतम म्हणाले, “डोळ्यांसमोर एखादी व्यक्ती संकटात असेल तर प्राणाची पर्वा न करता मदत करणे हे आई-वडिलांकडून शिकलेली गोष्ट आहे.” पोलीस निरीक्षक श्रीराम कन्हेरकर यांनीही गौतमच्या या तत्परतेला शाबासकी दिली आहे. या घटनेमुळे पोलिसांच्या मानवतावादी भूमिकेचे उत्तम दर्शन घडले असून, नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास वाढला आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed