• Fri. Mar 6th, 2026

    Ladki Bahin Yojana: जळगावात ‘लाडक्या बहिणी’ आक्रमक! कार्यालयात घुसून महिलांचा राडा; १ लाख जणींचे पैसे रखडल्याने संताप

    Ladki Bahin Yojana: जळगावात ‘लाडक्या बहिणी’ आक्रमक! कार्यालयात घुसून महिलांचा राडा; १ लाख जणींचे पैसे रखडल्याने संताप

    जळगाव जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचा लाभ रखडल्याने शेकडो महिला आक्रमक झाल्या आहेत.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    जळगाव: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात उलटसुलट चर्चा सुरू असतानाच, जळगाव जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. योजनेचे पैसे खात्यात जमा होत नसल्याने शेकडो संतप्त महिलांनी आज जळगावच्या महिला आणि बाल विकास कल्याण केंद्रावर धाड टाकली. कार्यालयात घुसून महिलांनी अधिकाऱ्यांना जाब विचारल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

    नेमका गोंधळ काय?

    राज्य सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातात. जळगाव जिल्ह्यात तब्बल १० लाखांहून अधिक महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत. डिसेंबर महिन्याचा हप्ता संक्रांतीपूर्वी मिळेल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, जळगावमधील सुमारे १ लाखाहून अधिक महिलांच्या खात्यात अद्याप एक रुपयाही जमा झालेला नाही. दीड वर्षांपासून सुरळीत सुरू असलेला लाभ अचानक बंद झाल्याने लाभार्थी महिलांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.केवायसीचा (KYC) जाच आणि तांत्रिक बिघाड या गोंधळाबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता, केवायसी (KYC) प्रक्रियेत झालेल्या चुकांमुळे ही अडचण निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. “आम्ही सर्व कागदपत्रे दिली, केवायसी केली, तरीही आमचे पैसे का कापले?” असा सवाल महिलांनी उपस्थित केला आहे. केवायसी करूनही तांत्रिक कारणास्तव लाभ मिळत नसल्याने महिलांचा संयम सुटला आणि त्यांनी थेट कार्यालयात धडक दिली.

    Maharashtra TimesLatur News: काँग्रेसला मोठा धक्का! ज्यांच्या अपहरणाची तक्रार झाली, त्या काँग्रेस उमेदवार 20 गाड्यांच्या ताफ्यासह अवतरल्या अन् अर्ज मागे घेतला

    मंत्री म्हणतात १८१ ला फोन करा, पण संपर्क होईना!

    काही दिवसांपूर्वीच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाभार्थी महिलांना काही अडचणी असल्यास १८१ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले होते. मात्र, जळगावमधील महिलांनी तक्रार केली आहे की, या हेल्पलाइन क्रमांकावर फोन लागतच नाही. “सरकार फक्त घोषणा करतंय, पण जमिनीवर आम्हाला मदतीऐवजी फक्त मनस्ताप मिळतोय,” असा आरोप आंदोलक महिलांनी केला आहे.

    अधिकाऱ्यांची पळापळ

    शेकडो महिला एकाच वेळी कार्यालयात घुसल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांची मोठी धावपळ उडाली. लवकरात लवकर तांत्रिक त्रुटी दूर करून रखडलेले पैसे खात्यात जमा न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या महिलांनी दिला आहे. आता या १ लाख महिलांना त्यांचे हक्काचे पैसे कधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा