• Mon. Mar 9th, 2026

    ‘शाळेला दांडी मारायची असली की बाळासाहेबांना मिठी मारायचो अन्…’; उद्धव ठाकरेंनी उलगडल्या ‘मातोश्रीतील हळव्या आठवणी

    ‘शाळेला दांडी मारायची असली की बाळासाहेबांना मिठी मारायचो अन्…’; उद्धव ठाकरेंनी उलगडल्या ‘मातोश्रीतील हळव्या आठवणी

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: हिंदुहृदयसम्राट आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त आज मुंबईत एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची एकाच व्यासपीठावरील उपस्थिती. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात अत्यंत भावूक होऊन केली. उद्धव ठाकरे यांनी आपल्या आयुष्यातील बाळासाहेब आणि माँसाहेबांच्या हळव्या आठवणी सांगतानाच, राज्याच्या सध्याच्या राजकारणावर सडेतोड भाष्य केले. “आम्ही वादळात खेळून मोठी झालेली मुलं आहोत, आम्हाला कुणी लढायला शिकवू नका,” अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना आव्हान दिले.

    उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात माँसाहेबांच्या (मीनाताई ठाकरे) योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. “माझी मा समयीच्या वातीसारखी होती, जी स्वतः जळत घर उजळून टाकत होती. प्रबोधनकारांची सून आणि शिवसेनाप्रमुखांची पत्नी म्हणून घर सांभाळताना तिने आम्हाला बाहेरच्या वादळाची जाणीवही होऊ दिली नाही. शाळेत जायचा कंटाळा आला की मी बाळासाहेबांना घट्ट मिठी मारायचो आणि तेही मला समजून घ्यायचे,” अशा शब्दांत त्यांनी घराण्यातील नात्यांचे पदर उलगडले.

    “घराणेशाहीचा अभिमान आहे!”

    विरोधकांकडून होणाऱ्या घराणेशाहीच्या आरोपांना उद्धव ठाकरेंनी सडेतोड उत्तर दिले. “ठाकरे नाव पुसायला अनेक जण मैदानात उतरले आहेत, पण ते नाव पुसलं जात नाहीये. आम्ही ज्या घराण्यात जन्मलो, त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. ज्यांना स्वतःच्या वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते, त्यांना मी काही करू शकत नाही. आम्हाला ही परंपरा लाभली हे आमचं भाग्य आहे,” असा टोला त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता लगावला.

    गद्दारीचा शाप आणि इतिहास

    महाराष्ट्राच्या इतिहासाचा दाखला देत उद्धव ठाकरे म्हणाले, “गद्दारीचा विषय आजचा नाही, तो पूर्वापार चालत आलेला एक शाप आहे. जेव्हा शत्रूला विजय अशक्य वाटतो, तेव्हाच तो गद्दारांची मदत घेतो. जर भगव्याशी गद्दारी झाली नसती, तर महाराष्ट्राने जगाचा इतिहास बदलला असता.”

    झाड आणि कुऱ्हाडीचा दांडा

    शिवसेनेच्या ६० वर्षांच्या प्रवासाची तुलना एका महाकाय वृक्षाशी करताना ते भावूक झाले. “एक मोठं झाड असतं, ज्यावर अनेक पिढ्या वाढतात. पण जेव्हा एखादा व्यापारी ते झाड कापायला येतो, तेव्हा त्या कुऱ्हाडीचा दांडा त्याच झाडाच्या लाकडाचा असतो, याचंच जास्त दुःख होतं. आज कुऱ्हाडीचे दांडेच आपल्या मुळावर घाव घालत आहेत,” अशी मार्मिक टिप्पणी त्यांनी बंडखोर नेत्यांवर केली.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा