• Fri. Mar 6th, 2026

    Navi Mumbai: नवी मुंबईत आणखी एका रेल्वे स्थानकाचा विकास, नव्या सुविधांमुळे बेलापूर, घणसोली, विमानतळाला थेट जोडणी; कसा-कुठे?

    Navi Mumbai: नवी मुंबईत आणखी एका रेल्वे स्थानकाचा विकास, नव्या सुविधांमुळे बेलापूर, घणसोली, विमानतळाला थेट जोडणी; कसा-कुठे?

    Kharkopar Railway station: नवी मुंबई विमानतळावर उड्डाणांना सुरुवात झाल्यानंतर आता परिसरातील अनेक रेल्वे स्थानकांचा विकास करण्यात येत आहे. रेल्वे स्थानकांची कनेकटीव्हीटी वाढवण्यासाठी महत्त्वाची पावले उचलली जात आहेत.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    नवी मुंबई: नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन झाल्यापासून परिसरातील अनेक रेल्वे स्थानकांचं पुनर्विकासाचं काम वेगात सुरू आहे. काही मार्गांवर नव्या लोकल गाड्याही धावू लागल्या आहेत. मात्र, नवी मुंबई विमानतळाच्या मार्गावरील एक महत्त्वाचं रेल्वे स्थानक अद्याप विकासाच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिक आणि रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मूलभूत सोयीसुविधांचा अभाव आजही जाणवत आहे.

    उल्वेजवळील खारकोपर रेल्वे स्थानकात सध्या पायाभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणात अभाव आहे. स्थानकाच्या आसपास काही बस थांबे असले तरी, येथे अद्याप एकही अधिकृत बस डेपो उभारण्यात आलेला नाही. परिणामी, Navi Mumbai Municipal Transport ( NMMT ) चे बस चालक आणि कंडक्टर बसमधून उतरल्यावर रस्त्यावरच उभे राहतात. विश्रांतीसाठी किंवा नियोजनासाठी कोणतीही ठोस सुविधा उपलब्ध नसल्याने कर्मचाऱ्यांनाही अडचणींचा सामना करावा लागतो.

    असा होणार विकास

    मात्र, आता या परिस्थितीत बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रविवारपासून, 11 जानेवारीपासून, सिडकोच्या अधिकाऱ्यांनी खारकोपर रेल्वे स्थानकासमोरील परिसरात बस डेपो उभारण्यासाठी जमिनीच्या पाहणीचे काम सुरू केले आहे. या पाहणीदरम्यान उपलब्ध जमीन, वाहतूक व्यवस्थेवर होणारा परिणाम आणि भविष्यातील प्रवासी वाढ लक्षात घेऊन कनेक्टिव्हिटीचा सविस्तर अहवाल तयार केला जाणार आहे.

    प्रवाशांना मिळणार दिलासा

    NMMTच्या बस सेवा खारकोपर आणि उल्वे परिसरातून नेरूळ, बेलापूर, घणसोली तसेच नवी मुंबई विमानतळाला थेट जोडणी देतात. त्यामुळे या मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक होते. विशेषतः विमानतळ सुरू झाल्यानंतर या मार्गावरील प्रवाशांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. खारकोपर परिसरात कामासाठी ये-जा करणारे प्रवासी गेल्या अनेक वर्षांपासून या प्रश्नावर नाराजी व्यक्त करत आहेत. रेल्वेने प्रवास करून स्थानकात उतरल्यावर बससाठी वाट पाहताना कोणताही निवारा नसल्याने उन्हातान्हात उभं राहावं लागतं. पावसाळ्यात परिस्थिती आणखी बिकट होते. तेव्हा आसपासच्या इमारतींच्या पोर्चमध्ये किंवा गाळ्यांखाली आसरा घेण्याची वेळ प्रवाशांवर येते.

    नवी मुंबई विमानतळामुळे आता या रेल्वे स्थानकासह प्रस्तावित बस डेपोचाही विकास होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यामुळे प्रवाशांना अधिक सुलभ आणि सुरक्षित कनेक्टिव्हिटी मिळणार असून, बस कर्मचारी वर्गालाही आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध होणार आहेत. येत्या काही काळात या मार्गावरील प्रवासात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता असून, नवी मुंबई विमानतळाला थेट आणि प्रभावी जोडणी मिळणार आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा