• Thu. Mar 12th, 2026

    दत्तक घेणारा बाप फिरकलाच नाही! राज ठाकरेंचा CM फडणवीसांवर थेट हल्ला; भलीमोठी यादीच वाचली

    दत्तक घेणारा बाप फिरकलाच नाही! राज ठाकरेंचा CM फडणवीसांवर थेट हल्ला; भलीमोठी यादीच वाचली

    मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. त्यांनी म्हटले की, १९५२ मध्ये जन्माला आलेल्या पक्षाला आजही दुसऱ्यांची पोरं मांडीवर घ्यावी लागतात. २०१७ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकला दत्तक घेण्याचे आश्वासन दिले होते, पण ते फिरकलेच नाहीत.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    नाशिक: १९५२ मध्ये जन्माला आलेल्या पक्षाला आजही दुसऱ्याची पोरं मांडीवर घ्यावी लागतात, अशा शब्दांत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भाजपचा समाचार घेतला आहे. जनसंघातून भाजपचा जन्म झाला. १९५२ मध्ये जनसंघाची स्थापना झाली. पुढे भाजपची स्थापना झाली. पण आजही यांना दुसऱ्यांचीच पोरं लागतात, असा खोचक टोला राज ठाकरेंनी लगावला. नाशिकमधील सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट लक्ष्य केलं.

    २०१२ मध्ये नाशिक महापालिकेत भाजपची सत्ता आली. त्या कालावधीत झालेल्या कामांचा उल्लेख राज यांनी केला. ‘पाच वर्षांमध्ये इतकी कामं करुनही जनतेनं पराभव केला. भाजपच्या भुलथापांना लोक बळी पडले, याचं वाईट वाटतं,’ अशी खंत त्यांनी बोलून दाखवली. २०१७ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये प्रचाराला आले. नाशिकमध्ये सत्ता द्या. मी नाशिकला दत्तक घेतो म्हणाले. पुढे तो बाप नाशिककडे फिरकलाच नाही, अशा शब्दांत राज यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली.
    Maharashtra Timesभाजप कार्यकर्त्यांनी 50 खोक्यांवरुन डिवचले, शिवसैनिक संतापले; AB फॉर्म काढला, भाजप उमेदवाराची गोची
    नाशिक दत्तक देण्याचं आवाहन करताना फडणवीस यांनी नाशिककरांना कोणकोणती आश्वासनं दिली होती, याची यादीच राज ठाकरेंनी वाचून दाखवली. मी प्रकल्पांची, योजनांची नावं वाचतो. तुम्हीच सांगा, यातली किती आश्वासनं पूर्ण झाली, असं राज ठाकरे गर्दीला उद्देशून म्हणाले. नाशिक न्यू मेट्रो प्रकल्प, नाशिक आयटी पार्क, नाशिक लॉजिस्टिक पार्क, द्वारका नाशिक उड्डाणपूल, नाशिक बाह्य रिंग रोड, नाशिक पुणे सेमी हाय स्पीड रेल्वे मार्ग, इगतपुरीला आदिवासी क्रीडा प्रबोधिनी, अशी फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनांची यादीच राज यांनी वाचून दाखवली. त्यावर समोरील गर्दीनं हे प्रकल्प पूर्णच झाले नसल्याचं सांगितलं.
    Maharashtra Times50 खोके, सॉरी सॉरी; 11 खोके, एकदम ओक्के! शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांसमोर भाजपची जोरदार घोषणा
    नाशिकमध्ये मनसेची सत्ता असताना २०१२ मध्ये कुंभमेळा झाला होता. त्यावेही एकही झाड तोडलं गेलं नव्हतं, असं राज म्हणाले. त्यावेळी मनसेची सत्ता होती. उत्तम नियोजन झालं. साधू संतांनी समाधान व्यक्त केलं. सगळ्याच पक्षांनी सहकार्य केलं. तेव्हा एकही झाड न तोडता कुंभमेळा झाला. मग आता झाडं का तोडावी लागत आहेत, असा सवाल राज यांनी विचारला. उद्योगपतींसाठी जमिनी मोकळ्या करायच्या. आधी तिथे कुंभमेळा घ्यायचा आणि मग हव्या असलेल्या उद्योगपतीच्या घशात घालायचा, असा यांचा डाव आहे, असा गंभीर आरोप राज ठाकरेंनी केला.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकर“कुणाल किशोर गवाणकर, महाराष्ट्र टाईम्समध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील राजकीय घडामोडींच्या बातम्या आणि त्यांचे विविध पैलू उलगडणारं लिखाण करण्यात हातखंडा. ब्रेकिंग न्यूज सोबतच राजकीय घडामोडींमधील बारकावे टिपून इनसाईड माहितीच्या आधारे सखोल विश्लेषण करणारं लिखाण करण्यात निष्णात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील रंजक घटना आणि घडामोडींवर लिखाण.
    तीन वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्समध्ये कार्यरत. त्याआधी लोकमत ऑनलाइन, लोकसत्ता ऑनलाइनमध्ये काम. न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 वृत्तवाहिन्यांमध्ये कामाचा अनुभव. पत्रकारितेत 14 वर्षांपासून कार्यरत.”
    … आणखी वाचा