Raj Thackeray Nashik Speech: नाशिकच्या संयुक्त सभेत राज ठाकरेंनी गिरीश महाजन यांची तुलना ‘लाकूडतोड्या’शी करत तपोवनाची जमीन उद्योगपतींच्या घशात घालण्याचा डाव असल्याचा दावा केला.
गिरीश महाजन यांची ‘लाकूडतोड्या’शी तुलना
तपोवनातील झाडे छाटण्यावरून राज ठाकरेंनी मंत्री गिरीश महाजन यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, “संजय राऊत आता म्हणाले तसे, यांना तपोवनातील झाडं छाटायची आहेत. त्या महाजनपेक्षा तो लाकूडतोड्या बरा होता, जो सोन्या-चांदीच्या कुऱ्हाडीला भुलला नाही. पण हे लोक झाडं छाटण्यापूर्वी स्वतःच्या पक्षातील कार्यकर्ते आणि माणसं छाटतात. बाहेरून झाडं मागवून ती आता पक्षात लावली जात आहेत.”
दत्तक विधान आणि नाशिककरांची फसवणूक
२०१७ च्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकला ‘दत्तक’ घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यावर प्रहार करताना राज ठाकरे म्हणाले, “२०१७ ला फडणवीस आले आणि नाशिक दत्तक घेतो म्हणाले. नाशिककर त्या विधानाला भुलले आणि आम्ही केलेली कामं विसरले. पण दत्तक घेतो म्हटल्यानंतर हा बाप पुन्हा कधी नाशिककडे फिरकलाच नाही.”
Crime News: खंडणी न दिल्याचा राग, दिवसाढवळ्या सराफाला तलवारींनी… 425 ग्रॅम सोनं लूटलं, भयावह प्रकाराने खळबळ
कुंभमेळा आणि उद्योगपतींचे ‘प्लॅनिंग’
२०१२ मधील मनसेच्या सत्तेत झालेल्या कुंभमेळ्याची आठवण करून देताना राज ठाकरे म्हणाले की, तेव्हा एकही झाड न कापता जागतिक स्तरावर कौतुक होईल असा कुंभमेळा आम्ही राबवला. मात्र आता वृक्षतोड करून ही जागा उद्योगपतींच्या घशात घालण्याचे प्लॅनिंग सुरू असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. “साधुसंत घरी गेल्यावर ही जमीन कुणाला द्यायची, हे यांचे आधीच ठरलेले असते,” असा टोला त्यांनी लगावला.
रतन टाटांपासून पाणीप्रश्नापर्यंत कामांचा पाढा
नाशिकच्या विकासाचा दावा करताना त्यांनी सांगितले की, त्यांच्या काळात रतन टाटांसारखे दिग्गज उद्योगपती नाशिकमध्ये आले. मुकणे धरणातून पाईपलाईन आणून नाशिकचा पुढील ५० वर्षांचा पाण्याचा प्रश्न मनसेने निकाली लावला. “नाव ठेवण्यामध्ये मी पक्का आहे, पण कामातही मागे नाही,” असे म्हणत त्यांनी नाशिककरांना पुन्हा एकदा साद घातली.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या या संयुक्त सभेमुळे नाशिकच्या राजकारणात नवी समीकरणे पाहायला मिळत आहेत.
