• Sun. Mar 8th, 2026
    Akola Election: अजब टॉसची चर्चाच चर्चा; ‘ईश्वर चिठ्ठी’ उघडली अन् एमआयएमचा उमेदवार थेट निवडणुकीच्या रिंगणाबाहेर

    अकोला महापालिका निवडणुकीत यंदा एक गंमतीदार किस्सा पाहायला मिळाला आहे. दोन ताकदवान उमेदवारांमध्ये एक चिठ्ठी….

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    प्रियंका जाधव, अकोला: राजकारण म्हटलं की चुरस, ईर्षा आणि एकमेकांचे पाय खेचणे आलेच! पण अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकीत एक असा ‘क्लायमॅक्स’ पाहायला मिळाला, जो पाहून भलेभले राजकीय विश्लेषकही चक्रावून गेले आहेत. प्रभाग क्रमांक १६ मध्ये रंगलेलं हे नाट्य कोणत्याही सस्पेन्स थ्रिलरपेक्षा कमी नव्हतं. येथे दोन तगड्या उमेदवारांच्या नशिबाचा फैसला चक्क ‘ ईश्वर चिठ्ठी ‘ने झाला आणि एका उमेदवाराला हसत-हसत माघार घ्यावी लागली.
    जेव्हा ‘मतांचे गणित’ आणि ‘समाजहित’ आमनेसामने आले.

    प्रभाग १६ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) आणि एमआयएम (MIM) या दोन्ही पक्षांनी शड्डू ठोकला होता. दोन्ही उमेदवारांची ताकद तोडीस तोड असल्याने ‘काटे की टक्कर’ निश्चित होती. मात्र, या लढतीत मुस्लिम मतांचे विभाजन होऊन तिसऱ्याचाच फायदा होईल, अशी भीती समाजधुरीणांना वाटू लागली. मग काय? ‘एकता’ टिकवण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी मैदानात उडी घेतली आणि दोन्ही पक्षांना एकाच टेबलावर आणले.
    अन् निघाली ती ‘जादुई’ चिठ्ठी.

    बैठकीत चर्चा झाली, खलबतं झाली, पण माघार कुणी घ्यायची? हा प्रश्न सुटता सुटेना. अखेर लोकशाहीच्या या लढाईत ‘दैवाचा’ कौल घेण्याचं ठरलं. एका डब्यात दोन चिठ्ठ्या टाकल्या गेल्या. संपूर्ण प्रभागाचे श्वास रोखले गेले होते. जेव्हा चिठ्ठी उघडली, तेव्हा त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) या उमेदवाराचे नाव झळकले.

    Maharashtra TimesJalgaon Election: जळगावात भाजपच्या आदेशाची ऐशी-तैशी! निष्ठावंत वाऱ्यावर, आमदारांच्या पुत्राची थेट बिनविरोध निवड

    हारूनही जिंकलं एमआयएम

    ईश्वर चिठ्ठीचा कौल येताच, एमआयएमच्या उमेदवाराने कोणताही आढेवेढा न घेता शब्दाला जागत आपला अर्ज मागे घेतला. अकोल्याच्या राजकीय इतिहासात ‘चिठ्ठी’ काढून उमेदवारीचा फैसला होण्याची ही पहिलीच वेळ असावी.

    दरम्यान, सध्या अकोला महापालिकेच्या गल्लोगल्लीत या ‘इश्वर चिठ्ठी’चीच चर्चा सुरु आहे. उमेदवाराने माघार घेतली असली तरी, समाजहितासाठी घेतलेला हा निर्णय म्हणजे एकीचा विजय आहे, अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

    आता या चिठ्ठीचा चमत्कार मतपेटीत काय जादू करतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा