नागपूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये अंतर्गत हालचाली वाढल्या आहेत. उमेदवारीवरून व्यक्त झालेल्या भावना राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहेत.
या बैठकीदरम्यान संदीप जोशी यांनी कार्यकर्त्यांच्या भावना ऐकून घेतल्या. ते म्हणाले की, या प्रभागात मागील निवडणुकीत तीन जागा निवडून आणणारे हेच कार्यकर्ते आहेत. स्वच्छ आणि निष्ठावान काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवडून दिले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांची नाराजी स्वाभाविक आहे. मी सर्वांची मते ऐकून घेतली असून हा विषय लवकरच पार्लमेंटरी बोर्डच्या बैठकीत मांडणार आहे.
बाहेरून आलेल्या उमेदवाराला तिकीट दिल्याने स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये रोष आहे. अनेक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, वर्षानुवर्षे पक्षासाठी झटणाऱ्यांना डावलून नव्या व बाहेरच्या लोकांना संधी दिली जात आहे. यावर बोलताना संदीप जोशी म्हणाले की, आज भारतीय जनता पार्टी खूप मोठी झाली आहे. नागपूर महानगरपालिकेत १५१ नगरसेवकांची जागा आहे, तर जवळपास ५००० इच्छुक उमेदवार तिकीट मागत आहेत. त्यामुळे सर्वांनाच समाधान मिळणे शक्य नाही. याच कारणामुळे नाराजी निर्माण झाली आहे.
Prakash Ambedkar: ‘शरद पवार भाजपसोबत जाणार’, प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
ते पुढे म्हणाले की, ज्यांना बाहेरून उमेदवारी मिळाली आहे ते देखील आता भाजपचेच कार्यकर्ते आहेत. मात्र स्थानिक कार्यकर्त्यांना वाईट वाटणे स्वाभाविक आहे. स्थानिक उमेदवारालाच तिकीट मिळावे, अशी त्यांची भावना आहे.
या बैठकीत एका महिला कार्यकर्त्यांनी आपली खदखद व्यक्त केली. “मी गेल्या ३० वर्षांपासून भाजपसाठी काम करत आहे. मी सक्षम कार्यकर्ता असून यापूर्वीही उमेदवारीचे आश्वासन देण्यात आले होते, मात्र तिकीट मिळाले नाही. यावेळीही उमेदवारीचे आश्वासन देऊन डावलण्यात आले. आम्हाला तिकीट न देता कधीही पक्षाच्या कामात न दिसणाऱ्या नव्या लोकांना उमेदवारी दिली जाते, हे दुर्दैवी आहे,” असे त्या म्हणाल्या.
कार्यकर्त्यांनी असा सवालही उपस्थित केला की, “आम्ही नितीन गडकरी यांना निवडून दिले ते केंद्रात मंत्री झाले आणि देवेंद्र फडणवीस यांना निवडून दिले. ते मुख्यमंत्री झाले, तर नागपूरचा महापौर निवडून देण्याची जबाबदारी आमच्यावर नाही का?” काँग्रेसमधून आलेल्या उमेदवाराला भाजपने तिकीट दिल्यामुळेच कार्यकर्त्यांचा विरोध अधिक तीव्र झाल्याचे या बैठकीत कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले.
