• Sun. Jun 14th, 2026
    मोठी बातमी: ठरलं! मुंबईत ठाकरे बंधूंना पवारांची साथ; 52 नाही, तर ‘इतक्या’ जागांवर लढणार

    ठाकरे बंधू अर्थात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या ऐतिहासिक युतीनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षानेही या आघाडीला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    मुंबई:
    आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेच्या रणांगणात आता मराठी अस्मिता आणि अनुभवाची सांगड पाहायला मिळणार आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीनंतर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही या आघाडीत सामील होण्याचा निर्णय घेतल्याने महायुतीसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. येत्या १५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी राज्याच्या राजकारणात ही आणखी एक मोठी उलथापालथ झाली आहे.

    ५२ जागांची मागणी अखेर १० वर

    मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार यांच्या पक्षाने सुरुवातीला ५२ जागांची मागणी केली होती. मात्र, प्रदीर्घ चर्चेअंती अखेर १० जागांवर तडजोड करण्यात आली आहे. उबाठा-मनसे आघाडीने राष्ट्रवादीला १० जागा सोडल्या असून, या जागांवर राष्ट्रवादीचे वजनदार उमेदवार मैदानात उतरवले जाणार आहेत. उमेदवारांची अधिकृत यादी लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.

    मुंबईत कोणाची ताकद?

    मुंबई महापालिकेवर गेली तीन दशके शिवसेना (संयुक्त) आपले वर्चस्व टिकवून होती. मात्र, पक्षातील फुटीनंतर यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार आहे. शिवसेना (उबाठा)चा आजही मुंबईतील मध्यमवर्गीय आणि मराठी मतदारांमध्ये मोठा प्रभाव आहे. तर दुसरीकडे मनसे म्हणजे राज ठाकरेंची आक्रमक शैली आणि तरुण वर्गातील आकर्षण युतीसाठी फायदेशीर ठरू शकते. त्याचवेळी शरद पवारांच्य़ा राष्ट्रवादीची मुंबईतील ताकद मर्यादित असली तरी, काही विशिष्ट ईशान्य मुंबईसारख्या पट्ट्यांमध्ये शरद पवारांना मानणारा मोठा वर्ग आहे.

    Maharashtra TimesSolapur Crime : ज्याला ‘खास मित्र’ मानलं, त्यानेच… तृतीयपंथी उमेदवाराच्या हत्येचं गूढ उकललं

    युतीचे समीकरण आणि यश

    ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे मराठी मतांचे होणारे विभाजन थांबणार आहे. यात शरद पवारांची साथ मिळाल्याने ठाकरेंची ताकद वाढली आहे. मराठी माणूस आणि मुंबईवरील हक्क या मुद्द्यांवर ही युती मते मागणार आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, जर हे तिन्ही पक्ष एकत्रित ताकदीने लढले, तर मुंबईचा महापौर पुन्हा एकदा ‘मराठीच’ असेल, हा राज ठाकरेंचा दावा खराही ठरू शकतो.

    राष्ट्रवादीला १० जागांवर यश मिळणार का?

    दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेल्या १० जागा या प्रामुख्याने अशा प्रभागांमध्ये आहेत जिथे पक्षाची चांगली पकड आहे. राखी जाधव, धनंजय पिसाळ यांसारख्या चेहऱ्यांमुळे राष्ट्रवादीला या जागांवर यश मिळवणे कठीण जाणार नाही, असे बोलले जात आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा