Mumbai News: बंदी असतानाही काही ठिकाणच्या कबुतरखान्यांवर कबुतरांना दाणे टाकणे सुरूच असल्याची गंभीर दखल घेऊन उच्च न्यायालयाने संबंधितांवर एफआयआर नोंदवण्याचे निर्देश ३० जुलै २०२५ रोजी दिले होते.
कबुतरखान्यांच्या ठिकाणांवर कबुतरांचे जमणे आणि त्यामुळे त्यांच्या विष्ठा, पिसे अशा कारणांनी नागरिकांना श्वसनविकार जडत असल्याचे तसेच, आधीपासून श्वसनविकार असलेल्या नागरिकांचे आजार बळावत असल्याचे लक्षात घेऊन महापालिकेने काही महिन्यांपूर्वी मुंबईतील कबुतरखान्यांवर बंदी घातली. त्यानंतर या बंदीविरोधात काही पक्षीप्रेमींनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका केली. मात्र नागरिकांचे आरोग्य सर्वोच्च स्थानी असल्याचे म्हणत ही बंदी उठवण्यास उच्च न्यायालयाने स्पष्ट नकार दिला.
Mumbai Crime: ‘थर्टी फर्स्ट’च्या आधीच मुंबईत मोठी कारवाई; तब्बल 36 कोटींचे हेरॉइन जप्त, नऊ अटकेत
या पार्श्वभूमीवर, महापालिकेनेही याप्रश्नी कठोर भूमिका घेऊन अनेक ठिकाणच्या अशा प्रकारांबद्दल संबंधितांविरोधात गुन्हा नोंदवला. त्यापैकीच एक एफआयआर हा दादरमधील व्यावसायिक नितीन शेठ यांच्याविरोधात होता. बंदी असतानाही १ ऑगस्ट रोजी सकाळी ६.५० वाजता माहीम एल. जे. रोड येथील कबुतरखान्याच्या ठिकाणी त्यांनी कबुतरांना दाणे टाकले. याविषयीचे पुरावे नोंदवून प्रशासनाने त्यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ (ब) अन्वये (मानवी जीव, आरोग्य किंवा सुरक्षिततेला धोका निर्माण करणारे कृत्य करणे आणि त्याविषयीच्या सरकारी आदेशाचे उल्लंघन करणे) आणि कलम २७१ अन्वये (जीवघेणे आजार पसरवू शकणारे निष्काळजी कृत्य करणे) माहीम पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवला.
याप्रकरणी पोलिसांनी तपासाअंती शेठ यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केल्यानंतर वांद्रे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी व्ही. यू. मिसाळ यांच्यासमोर खटला चालला. न्यायाधीशांनी शेठ यांना त्यांच्यावरील आरोप वाचून दाखवले. ‘मानवी जीवाला धोका निर्माण करणारा जीवघेणा आजार पसरेल, याची जाणीव असूनही बंदी असताना बेकायदा पद्धतीने व हलगर्जीपणे कृती केल्याच्या तुमच्यावर आरोप आहे आणि तसे आरोपपत्रही आहे. ते तुम्हाला समजले आहे का? आणि आरोपपत्राची प्रत तुम्हाला मिळाली आहे का?,’ अशी विचारणा न्यायाधीशांनी शेठ यांना केली असता, त्यांनी होकारार्थी उत्तर दिले.
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरु असतानाच Jayant Patil ठाकरेंच्या भेटीला, ‘मातोश्री’वर खलबतं
‘तुम्ही स्वत:ला दोषी मानता का?’, अशी विचारणाही न्यायालयाने अखेरीस केली. तेव्हा, ‘गुन्हा कबूल आहे,’ असे उत्तर देत शेठ यांनी सौम्य शिक्षा देण्याची विनंती केली. त्यानंतर ‘आरोपीने स्वेच्छेने कबुली दिली असून ती स्वीकारण्यात येत आहे आणि त्याप्रमाणे त्याला दोषी ठरवण्यात येत आहे,’ असे न्यायाधीशांनी स्पष्ट केले.
कारावासाचीही तरतूद
पोलिसांनी नोंदवलेल्या गुन्ह्याबाबत कमाल एक वर्षाचा कारावास किंवा पाच हजार रुपयांचा दंड किंवा दोन्ही अशी तरतूद आहे. मात्र, आरोपीने स्वेच्छेने गुन्ह्याची कबुली देत दयेची याचना केली. त्यामुळे न्यायालयाने शेठ यांना केवळ पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली
