ठाकरे बंधूंची युती जाहीर झालेली आहे. त्यांच्या समोर आता अनेक महापालिकांमध्ये महायुतीचं आव्हान असेल. नगर परिषद, नगर पंचायतीत स्वबळावर लढलेल्या शिंदेसेना, भाजपनं आता युतीत लढण्याचे संकेत दिले आहेत.
कल्याण-डोंबिवलीत शिंदेसेना आणि भाजप यांच्यातील फोडाफोडीचं राजकारण टोकाला गेलं होतं. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तडकाफडकी दिल्ली गाठली आणि केंद्रीय अमित शहांची भेट घेतली. यानंतर एकमेकांचे नेते, पदाधिकारी फोडायचे नाहीत, असा तह दोन्ही पक्षांमध्ये झाला. यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण दिल्लीला जाऊन आले. त्यांनी अमित शहांची भेट घेतली. शिंदेसेनेसोबत युती करा, अशा सूचना दिल्लीवरुन करण्यात आल्या. त्यानंतर राज्यातील चित्र अचानक बदललं.
Thackeray Alliance: ठाकरेंची युती, शिंदेसेना लाभार्थी; भाजपनं रणनीती बदलली, MDM फॅक्टर गेमचेंजर ठरणार?
मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबईसह अन्य महापालिकांमध्ये भाजप आणि शिंदेसेना एकत्र लढणार आहे. भिवंडीदेखील याला अपवाद नाही. शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या बदलापूर, अंबरनाथ नगरपालिका शिवसेनेच्या हातून निसटल्या आहेत. इथे अनेक वर्षे शिवसेनेची सत्ता राहिलेली आहे. पण यंदा इथे पराभव झाल्यानं शिंदे काहीसे बॅकफूटवर गेले आहेत. त्यामुळे आता ते सगळीकडे युतीसाठी आग्रही आहेत. भिवंडी महापालिकेत विजयाची हंडी महायुती फोडेल, असं शिंदे यांनी नुकतंच जाहीर केलं. त्यानंतर भाजप कार्यकर्ते अवाक् झाले. त्यांनी शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. शिंदे यांच्या विधानामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे.
भिवंडीत युती होणार नाही, म्हणून आम्ही गेल्या तीन-चार महिन्यांपासून तयारी केली होती. पण आता युती झाली तर आम्ही तयारी केलेल्या जागा भाजपच्या वाट्याला जाणार असल्यानं आमची मेहनत वाया जाणार नाही. आमचं स्वप्न भंगणार, अशा भावना शिंदेसेनेच्या एका इच्छुकानं नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर व्यक्त केल्या.
राजकीय भूकंपाचा केंद्रबिंदू ठरलेल्या शहरात शिंदेसेनेचा सूर एकाएकी बदलला; भाजप काय करणार?
गेल्या महापालिका निवडणुकीत भाजपनं १९, तर एकसंध शिवसेनेनं १२ जागा जिंकल्या होत्या. यंदा युतीबद्दल स्पष्टता नसल्यानं भाजप आणि शिंदेसेनेच्या स्थानिकांनी स्वबळावर लढण्याची तयारी सुरु केली. शिंदेसेनेतील अनेक इच्छुकांनी आपापल्या प्रभागात विविध कार्यक्रम हाती घेतले. पण आता महायुती होणार असल्यानं, तशी घोषणा शिंदे यांनीच केल्यानं शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता आहे.
