कर्जबाजारीपणामुळे मानसिक तणावाखाली येऊन एकाने स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतल्याची धक्कादायक घटना मावळमध्ये घडली आहे…
मंगळवारी सकाळी मंगेश आकुर्डीतून आपल्या मूळ गाव भोईरे येथे वडिलांना भेटण्यासाठी गेले होते. वडिलांची भेट झाल्यानंतर ते टाकवे येथील इंद्रायणी नदी पुलावर थांबले. यावेळी त्यांनी आपल्या भावाला फोन करून आपण आत्महत्या करत असल्याची माहिती दिली. पुलावर दुचाकी उभी असून मोबाईल व पाकीट तिथेच ठेवत असल्याचंही त्यांनी सांगितलं. यानंतर मंगेश यांनी पत्नीला फोन केला. “तुझ्या कपाळावरील टिकली काढून टाक,” असे सांगून त्यांनी फोन बंद केला आणि क्षणाचाही विलंब न करता वाहत्या इंद्रायणी नदीत उडी घेतली.
सक्षम ताटे हत्या प्रकरण: जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच सक्षमची प्रेयसी आचल आणि आईचा आत्मदहनाचा प्रयत्न; नेमकं कारण काय?
तोपर्यंत भाऊ व पत्नी घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र मंगेश कुठेही दिसत नसल्याने आत्महत्येचा संशय अधिक बळावला. तत्काळ शोधकार्य सुरू करण्यात आले, मात्र ते सापडले नाहीत. अखेर वडगाव पोलीस ठाण्यात मंगेश बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली. आज सकाळी शिवदुर्ग मित्र मंडळ व वनजीव रक्षक मावळ रेस्क्यू टीमच्या संयुक्त शोधमोहीमेत मंगेश यांचा मृतदेह नदीत सापडला. वडगाव पोलिसांनी तात्काळ मंगेश यांच्या पत्नी व भावाला बोलावून मृतदेहाची ओळख पटवली. तो मंगेश असल्याचं निष्पन्न झालं.
पोलिसांच्या माहितीनुसार, मंगेश यांच्यावर मोठ्या प्रमाणात कर्ज होते. गेल्या काही दिवसांपासून ते मानसिक तणावात होते. याच तणावातून त्यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज वडगाव पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, कर्जबाजारीपणामुळे होणाऱ्या मानसिक दबावावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
