• Fri. Jun 12th, 2026
    Pune News: वडिलांची भेट घेतली, भावाला फोन केला आणि पत्नीला ‘तो’ निरोप देऊन मंगेशने घेतला कायमचा निरोप, पुणे हळहळलं!

    कर्जबाजारीपणामुळे मानसिक तणावाखाली येऊन एकाने स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतल्याची धक्कादायक घटना मावळमध्ये घडली आहे…

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    श्रीकृष्ण पांचाळ, पिंपरी-चिंचवड: पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात कर्जाच्या तणावातून ४३ वर्षीय व्यक्तीने इंद्रायणी नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. काही तासांच्या शोधकार्यानंतर आज सकाळी मृतदेह सापडला असून, पोलिसांनी त्याची ओळख पटवली आहे. मंगेश जनार्धन जांभुळकर (वय ४३) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. मंगेश यांच्या पश्चात पत्नी व मुले असा परिवार आहे. ते पिंपरी- चिंचवड येथील एका पेपर मिलमध्ये कामाला होते.

    मंगळवारी सकाळी मंगेश आकुर्डीतून आपल्या मूळ गाव भोईरे येथे वडिलांना भेटण्यासाठी गेले होते. वडिलांची भेट झाल्यानंतर ते टाकवे येथील इंद्रायणी नदी पुलावर थांबले. यावेळी त्यांनी आपल्या भावाला फोन करून आपण आत्महत्या करत असल्याची माहिती दिली. पुलावर दुचाकी उभी असून मोबाईल व पाकीट तिथेच ठेवत असल्याचंही त्यांनी सांगितलं. यानंतर मंगेश यांनी पत्नीला फोन केला. “तुझ्या कपाळावरील टिकली काढून टाक,” असे सांगून त्यांनी फोन बंद केला आणि क्षणाचाही विलंब न करता वाहत्या इंद्रायणी नदीत उडी घेतली.

    Maharashtra Timesसक्षम ताटे हत्या प्रकरण: जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच सक्षमची प्रेयसी आचल आणि आईचा आत्मदहनाचा प्रयत्न; नेमकं कारण काय?

    तोपर्यंत भाऊ व पत्नी घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र मंगेश कुठेही दिसत नसल्याने आत्महत्येचा संशय अधिक बळावला. तत्काळ शोधकार्य सुरू करण्यात आले, मात्र ते सापडले नाहीत. अखेर वडगाव पोलीस ठाण्यात मंगेश बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली. आज सकाळी शिवदुर्ग मित्र मंडळ व वनजीव रक्षक मावळ रेस्क्यू टीमच्या संयुक्त शोधमोहीमेत मंगेश यांचा मृतदेह नदीत सापडला. वडगाव पोलिसांनी तात्काळ मंगेश यांच्या पत्नी व भावाला बोलावून मृतदेहाची ओळख पटवली. तो मंगेश असल्याचं निष्पन्न झालं.

    पोलिसांच्या माहितीनुसार, मंगेश यांच्यावर मोठ्या प्रमाणात कर्ज होते. गेल्या काही दिवसांपासून ते मानसिक तणावात होते. याच तणावातून त्यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज वडगाव पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, कर्जबाजारीपणामुळे होणाऱ्या मानसिक दबावावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा