• Wed. Mar 11th, 2026
    Navi Mumbai: लोकलच्या गर्दीत तरुणाला हार्ट अटॅक, पण नशिबाचा फेरा पाहा; रुग्णवाहिकेचा ड्रायव्हर जेवायला गेला अन् घात झाला!

    लोकल ट्रेनमधील प्रवासात अचानक घडलेल्या घटनेमुळे वैद्यकीय मदतीच्या तत्काळ उपलब्धतेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. नेमकं काय घडलं?

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: मुंबई, स्वप्नांची नगरी. रोज लाखो लोक लोकलने प्रवास करतात. गर्दीमुळे अनेकांना त्रास होतो, जीव गुदमरतो, चक्कर येते. कधीकधी अपघातही होतात, ज्यात गंभीर दुखापत होते किंवा प्राणही जातात. अशीच एक धक्कादायक घटना नुकतीच घडली आहे. एका २५ वर्षीय तरुणाला लोकल प्रवासात हृदयविकाराचा झटका आला. वेळेवर उपचार मिळाले असते तर त्याचा जीव वाचला असता, पण रुग्णवाहिका चालक जेवणासाठी गेल्याने त्याला तातडीने वैद्यकीय मदत मिळाली नाही आणि दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला.

    हर्ष पटेल असे या तरुणाचे नाव आहे. २ डिसेंबर रोजी दुपारी १.३७ वाजता तो चेंबूरहून पनवेल लोकलने प्रवास करत होता. प्रवासादरम्यान त्याला अचानक तीव्र हृदयविकाराचा झटका आला आणि तो बेशुद्ध पडला. सहप्रवाशांनी लगेच रेल्वे पोलिसांना (GRP) माहिती दिली. गाडी दुपारी १.५७ वाजता वाशी स्थानकात पोहोचली. पोलीस आणि प्रवाशांनी त्याला स्थानकाबाहेर असलेल्या १०८ रुग्णवाहिकेपर्यंत नेले. मात्र, तिथे पोहोचल्यावर धक्कादायक वास्तव समोर आले.

    Maharashtra TimesSolapur News: अंगावर किलोभर सोनं, डोळ्यात सत्तेचं स्वप्न! अजितदादांच्या दरबारी ‘अबोली अक्का’ची एन्ट्री; महापालिकेसाठी शड्डू

    रुग्णवाहिका होती, पण तिचा चालक जेवणासाठी बाहेर गेला होता. सुमारे १५ मिनिटे हर्षला रुग्णवाहिकेत ठेवून चालकाची वाट पाहावी लागली. वेळ निघून जात असल्याचे पाहून रेल्वे पोलिसांनी त्याला आपल्या सरकारी जीपमधून नवी मुंबई महानगरपालिका रुग्णालयात नेले. पण रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

    हर्षची बहीण अमिका हिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून रेल्वे प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. तिने म्हटले आहे की, वाशी स्थानकात स्ट्रेचर, व्हीलचेअर किंवा प्राथमिक उपचारांची कोणतीही सक्षम व्यवस्था नव्हती. प्रवाशांना हर्षला कपड्याच्या साहाय्याने उचलून सबवेमधून न्यावे लागले. रुग्णवाहिका चालकाचा कोणताही ‘बॅकअप’ प्रशासनाकडे उपलब्ध नव्हता.

    जीआरपी चौकीत तक्रार घेण्यास टाळाटाळ करण्यात आली आणि त्यांना सीएसएमटी येथील DRM कार्यालयात पाठवण्यात आले. या घटनेमुळे मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील त्रुटी आणि आपत्कालीन परिस्थितीत मिळणाऱ्या वैद्यकीय मदतीतील दिरंगाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रवाशांच्या जीवाला किती महत्त्व दिले जाते, हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा