• Fri. Mar 6th, 2026
    Uday Samant : ‘मलिक असतील, तर राष्ट्रवादी नको’, मुंबईसाठी उदय सामंतांची रोखठोक भूमिका

    Uday Samant on Nawab Malik : उदय सामंत यांनी नवाब मलिकांवर गंभीर आरोप केले आहेत. मलिक मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व करणार असतील, तर शिवसेनेला त्यांच्यासोबत जायचे नसल्याची भूमिका त्यांनी मांडली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : ‘ नवाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप केले जातात. त्यामुळे ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुंबईमध्ये नेतृत्व करणार असतील, तर आम्हाला त्यांच्यासोबत जायचे नाही,’ अशी स्पष्ट भूमिका शिवसेना नेते, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत मांडली.

    ‘महाविकास आघाडीला थांबवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र आले पाहिजे. विरोधक कोण आहेत, हे पण तपासले पाहिजे. त्यामुळे भाजप, शिवसेना कोणाला आमंत्रण घेऊन फिरत बसणार नाही. आमची मुंबईसाठी भूमिका स्पष्ट आहे. त्यामध्ये कोणतीही तडजोड होणार नाही,’ असेही सामंत यांनी स्पष्ट केले.
    Maharashtra TimesElection Result : अजितदादांचे ‘शरद पवार’ विजयी, चुरशीच्या लढतीत भाजपला मोठा धक्का, कुठे घडलं?
    ‘काँग्रेसला आता नेतृत्व राहिलेले नाही. जे प्रदेशाध्यक्ष आहेत, ते आता कमकुवत झाले आहेत. हे आता वडेट्टीवार यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे गांधी घराण्याच्या जवळ जाऊन कदाचित त्यांना काँग्रेस या पराभूत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व्हायचे असेल,’ असा टोलाही सामंत यांनी लगावला.

    मुंबई महानगरपालिकेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी कृती आराखडा तयार केला आहे. यावरून सामंत यांनी टीका केली. ‘त्यांचे आजवर अनेक कृती आराखडे तयार झाले, पण ‘ॲक्शन मोड’वर येणे गरजेचे असते. मुंबईत मराठी माणसाने त्यांच्या हातात आजवर सत्ता दिली, परंतु त्या 25 वर्षांत मुंबईकरांचे कसे वाटोळे केले, ते आपण पाहिले. आधी एकनाथ शिंदे आणि आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर मुंबईतील अनेक प्रश्न मार्गी लागले. निविदा आपल्याला परत कशा मिळतील म्हणून त्यांचा खरा कृती आराखडा आहे,’ अशी टीका सामंत यांनी केली.

    उदय सामंत मला सोडून ठाकरेंकडे गेले, मग शिंदेंकडे, तरी निष्ठावान! अजित पवारांच्या भाषणाने हशा पिकला

    दरम्यान, मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महायुतीच्या जागावाटपाची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, राष्ट्रवादीकडून नवाब मलिक हे पालिका निवडणुकीत नेतृत्व करत असल्याचे कारण पुढे करत युतीमध्ये त्यांचा समावेश करण्यास भाजपकडून नकार देण्यात आला आहे. त्यानंतर मलिक यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्याकडे पालिकेसाठीचा अहवाल सादर करत ५० जागांवर पक्ष ताकदीने निवडणूक लढवू शकतो, असे स्पष्ट केले होते. मात्र, महायुतीत इतक्या जागा मिळणे शक्य नसल्याने, स्वबळाची चाचपणी करण्याचे संकेत पवार यांनी दिले होते.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केकरिश्मा भुर्के, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सिनीअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. मागील ३ वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्समध्ये कार्यरत. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, त्यानंतर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.… आणखी वाचा