• Sat. Mar 7th, 2026
    दुपारी पुलावर चढला… क्षणात नदीत उडी! रागाच्या भरात टोकाचा निर्णय, गोदावरीत तरुणाचा दुर्दैवी अंत

    योगेश काकफळे, जालना: जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील शहागड गावाजवळून वाहणाऱ्या गोदावरी नदीपात्रात एका ३० वर्षीय तरुणाने उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना १४ डिसेंबर २०२५ रोजी घडली. या घटनेमुळे मृत तरुणाच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली असून आई-वडिलांनी एकच टाहो फोडला आहे.

    मृत तरुणाचे नाव विशाल बळीराम पवार (वय ३०, रा. छत्रपती संभाजीनगर) असे आहे. तो १४ डिसेंबर रोजी दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर येथून शहागड येथे आला होता. त्यानंतर शहागड येथील गोदावरी नदीवरील पुलाच्या कठड्यावर चढून त्याने अचानक नदीपात्रात उडी घेतली.

    या घटनेवेळी परिसरात उपस्थित असलेल्या काही स्थानिक नागरिकांनी हा प्रकार पाहून आरडाओरड केली. मात्र तोपर्यंत विशाल पवार नदीच्या पाण्यात बुडाला होता. घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन स्थानिक नागरिकांच्या मदतीने शोधमोहीम सुरू केली.

    Beed News: आई-वडील घरी परतले आणि हादरले, क्षणात सगळं संपलं; 17 वर्षीय मुलीनं स्वत:ला….

    सुमारे दोन ते तीन तासांच्या शोधानंतर तरुणाचा मृतदेह आढळून आला. त्याला तत्काळ शहागड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले, मात्र तेथील डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.

    मृत तरुणाच्या खिशात आधार कार्ड व इतर कागदपत्रे सापडली. त्या आधारे पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच मृताच्या आई-वडिलांनी आक्रोश केला आणि ते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

    या प्रकरणी मृताचे मामा कैलास चव्हाण यांच्या तक्रारीवरून गोंदी पोलीस ठाणे येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास जमादार रामदास केंद्रे करीत आहेत.

    दरम्यान, विशाल पवार हा रागाच्या भरात शहागड परिसरात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे, पण त्याने आत्महत्या का केली आहे यामागिल नेमकं कारण उलगडलेलं नाही, त्यामुळे या प्रकरणाच्या पुढील तपासात काय समोर येतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. या घटनेचा पुढील तपास गोंदी पोलीस करीत आहेत.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed