UP Man Ends Life: उत्तर प्रदेशातील विकास भारद्वाज या तरुणाने साताऱ्यात आत्महत्या केली. आर्थिक अडचणींमुळे नातेवाईक अंत्यसंस्कार करण्यास असमर्थ होते. सातारा पोलिसांनी ‘खिदमत-ए-खलक’ संस्थेशी संपर्क साधला. संस्थेने जाती, धर्म आणि प्रांताच्या पलीकडे जात हिंदू रितीरिवाजानुसार अंत्यसंस्कार करून माणुसकीचे नाते जपले.
नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशातील विकास भारद्वाज नामक तरूण कामाच्या शोधात साताऱ्यात आला होता. मात्र, त्याने 12 डिसेंबर रोजी आत्महत्या केली. दुसऱ्या दिवशी नातेवाईक साताऱ्यात पोहोचले. मात्र, दु:खद घटना आणि आर्थिक अडचणींमुळे हिंदू धर्मातील रितीरिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार करण्यास ते असमर्थ होते. अशा परिस्थितीत नातेवाईकांनी सातारा पोलिसांकडे मदतीची विनंती केली. सातारा पोलिसांनी खिदमत-ए-खलक या सामाजिक संस्थेशी संपर्क साधला.
Satara Crime : मुंबई पोलिसांचा साताऱ्यात छापा, जनावरांच्या गोठ्यात ‘नको तो धंदा’; जावळी तालुक्यात नक्की काय सुरुय?
खिदमत-ए-खलक संस्थेचे अध्यक्ष सादिक शेख यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अब्दुल सुतार, आरिफ खान, हाफिज मुराद आसिफ खान, शाहरुख शेख, मुस्तफा बागवान आणि इतर स्वयंसेवकांना बोलावून घेतले. त्यांच्या मदतीने संगम माहुली घाटावरील कैलास स्मशानभूमीत विकास भारद्वाज या तरूणावर हिंदू धर्माच्या विधीप्रमाणे अंत्यसंस्कार केले. मृत विकास भारद्वाजचे बंधू विनोद भारद्वाज आणि नातेवाईकांनी साश्रूपर्ण नयनांनी लाडक्या विकासला अखेरचा निरोप दिला.
धर्म, भाषा आणि प्रांताच्या पलीकडे जाऊन माणुसकीचे दर्शन घडवणाऱ्या या घटनेमुळे साताऱ्यातील खिदमत-ए-खलक संस्थेच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच ‘हमारा प्यारा हमे बताकर गया की इन्सानियत आज भी जिंदा है”, असे भावनिक उद्गार भारद्वाज कुटुंबीय आणि नातेवाईकांच्या तोंडून बाहेर पडले आणि सर्वांचेच डोळे पाणावले.
सातारकरांनो, तुमच्या सेवेची संधी द्या! अभिजीत बिचुकले उतरले नगर परिषदेच्या रिंगणात
या घटनेने समाजासमोर एक महत्त्वाचा संदेशही ठेवला आहे. आजच्या काळात वाढणारी दरी, तणाव आणि असहिष्णुतेच्या चर्चांमध्ये अशा माणुसकीच्या कृती आशेचा किरण ठरतात. संकटात सापडलेल्या कुटुंबासाठी धर्म किंवा ओळख महत्त्वाची न ठरता माणूस म्हणून मदतीला धावून जाणे, हीच खरी सामाजिक बांधिलकी असल्याचे खिदमत-ए-खलक संस्थेच्या कार्यातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. साताऱ्यात घडलेली ही घटना अनेकांना माणुसकीची जाणीव करून देणारी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
