• Fri. Mar 13th, 2026

    Kolhapur Crime: माझी बॉडी पाण्याबाहेर यायला वेळ लागेल; कोल्हापुरात प्रसिद्ध डॉक्टरने मृत्यूला कवटाळले, शेवटचा धक्कादायक मेसेज समोर

    Kolhapur Crime: माझी बॉडी पाण्याबाहेर यायला वेळ लागेल; कोल्हापुरात प्रसिद्ध डॉक्टरने मृत्यूला कवटाळले, शेवटचा धक्कादायक मेसेज समोर

    साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर: कौटुंबिक तणावातून तरुणाने टोकाचा निर्णय घेतल्याची घटना कोल्हापुरात उघडकीस आली आहे. कोल्हापुरातील राजाराम तलावात एका व्यक्तीने चक्क पाठीवर दगड विटांनी भरलेली बॅग अडकवून आत्महत्या केली आहे. जयसिंगपूर येथील या व्यक्तीने आत्महत्येपूर्वी आपल्या मित्र परिवारातील सर्वांना आणि कुटुंबीयांना मोबाईलवर मेसेज पाठवला होता. त्यामुळे या घटनेने कोल्हापूर सह जयसिंगपुरात खळबळ उडाली आहे.

    जयसिंगपूर शहरातील तरुण दंतचिकित्सक अवधूत प्रकाश मुळे (वय 35, रा. जयसिंगपूर – 11 वी गल्ली) यांनी कौटुंबिक तणाव आणि मानसिक नैराश्याच्या स्थितीतून शुक्रवारी उशिरा रात्री राजाराम तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. शुक्रवारी सकाळी तलावाच्या काठावर त्यांची दुचाकी आढळल्याने या घटनेचा उलगडा झाला. तर शोध घेतल्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास अग्निशमन दल आणि रेस्क्यू पथकाच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. राजारामपुरी पोलिसांनी सुसाईड नोट आणि मोबाईल संदेश जप्त करून याप्रकरणी तपास सुरू केला आहे.

    दुचाकीवर सुसाईड नोट, बॅगेत दगड-विटा
    राजारामपुरी पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी काही नागरिकांना तलावाच्या काठावर दुचाकी उभी असल्याचे दिसले. दुचाकीवर एक हाताने लिहिलेली चिठ्ठी आढळल्याने त्यांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधला. प्राथमिक तपासात ही दुचाकी अवधूत मुळे यांच्या नावावर असल्याचे स्पष्ट झाले. तलावाच्या परिसरात शोध घेतल्यानंतर, अवधूत यांनी आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. तपासादरम्यान त्यांच्या पाठीवरील बॅगेत दगड आणि विटा असल्याचे निदर्शनास आले. तलावात उडी घेतल्यानंतर मृतदेह पाण्यावर न येण्यासाठी त्यांनी असे केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

    आत्महत्येपूर्वी पाठवले शेवटचे मेसेज..
    शुक्रवारी रात्री अवधूत यांनी आपल्या काही जवळच्या मित्रांना आणि परिचितांना मोबाईलवर मेसेज पाठवले होते. “मी पाठीवरील बॅगेत दगड विटा भरून तलावात उडी घेत आहे, मृतदेह पाण्याबाहेर यायला वेळ लागेल” अशा आशयाचे भावनिक मेसेज त्यांनी पाठवले होते, अशी माहिती त्यांच्या मित्रपरिवाराकडून पोलिसांना देण्यात आली आहे. या संदेशांमधून मानसिक नैराश्याची स्पष्ट चिन्हे दिसून आली आहेत. पोलिसांनी संबंधित मोबाईल संदेश तपासासाठी हस्तगत केले आहेत.

    माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली रेस्क्यू पथक आणि अग्निशमन दलाची शोधमोहीम सुरू करण्यात आली. सुमारे चार ते पाच तासांच्या प्रयत्नांनंतर सायंकाळी सहाच्या सुमारास मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आला. त्यानंतर मृतदेहाला उत्तरीय तपासणीसाठी शेंडा पार्क येथील सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आले. प्राथमिक तपासात आत्महत्येचा निष्कर्ष नोंदविण्यात आला असून, सुसाईड नोट आणि मोबाईल संदेशांच्या आधारे सखोल तपास सुरू असल्याचे राजारामपुरी पोलिसांनी सांगितले.

    गावात हळहळ, पोलिसांकडून पुढील चौकशी
    अवधूत मुळे हे जयसिंगपूरमधील एक प्रस्थापित दंतचिकित्सक म्हणून ओळखले जात होते. गेल्या काही दिवसांपासून ते मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे. त्यांच्या या टोकाच्या निर्णयाने परिसरात शोककळा पसरली असून, नातेवाईक आणि मित्रपरिवार शोकाकुल झाले आहेत.

    दरम्यान, राजारामपुरी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली आत्महत्येची नोंद करण्यात आली असून, अवधूत यांच्या नैराश्येमागच्या आणि आत्महत्येच्या कारणांचा पुढील तपास सुरु असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed