हलबा समाजाने आदिवासी हक्क आणि जात प्रमाणपत्राच्या मागणीसाठी सुरू केलेले आंदोलन तीव्र झाल्याचे पाहायला मिळाले आहे. जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि….
आंदोलनकर्ते तलावात उतरण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी तत्परतेने हस्तक्षेप करून त्यांना रोखले. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून तलावाजवळ रेस्क्यू बोट तैनात करण्यात आली होती. आंदोलनकर्ते आणि पोलिस आमनेसामने येत काही काळ तणाव वाढला. अखेर पोलिसांनी काही आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. घटनास्थळी मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
हलबा समाजाची प्रमुख मागणी म्हणजे, “कोष्टी हा व्यवसायवाचक शब्द असून जात नव्हे. त्यामुळे जात प्रमाणपत्र ‘हलबा’ या नावाने द्यावे आणि समाजाला आदिवासी दर्जा द्यावा.” अनेक दशकांपासून हीच मागणी प्रलंबित आहे. आश्वासने देण्यात येतात, परंतु प्रत्यक्षात कोणतीही कारवाई होत नसल्याने आंदोलनाशिवाय अन्य पर्याय राहिला नसल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.
Ladki Bahin Yojna: लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ई-केवायसी दुरुस्त करण्यास अंतिम संधी, ‘या’ तारखेपर्यंत चुका सुधारून घ्या…
दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून आंदोलनाने आक्रमक वळण घेतले आहे. दोन दिवसांपूर्वी आंदोलनकर्त्यांनी गामीनीकाव्या पद्धतीने निदर्शने केली होती. त्यापूर्वी टायर जाळून निषेध व्यक्त केला गेला. तर बुधवारी रात्री अज्ञातांनी एका बसवर हातोडी मारून नुकसान केले आणि “हलबा एकता” अशी पत्रके परिसरात फेकली. या घटनेची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.
आंदोलनकर्त्यांनी इशारा दिला आहे की, सरकारने लगेच सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल. “आमची जात “हलबा”असून आम्ही आदिवासी हक्कांसाठी लढत आहोत. वर्षानुवर्षे सुरू असलेल्या अन्यायाविरोधात निर्णायक लढा देण्याची वेळ आली आहे,” अशी भूमिका त्यांनी मांडली. सरकारकडून या आंदोलनाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र गल्लीपासून विधानमंडळापर्यंत हलबा समाजाची नाराजी असल्याने परिस्थिती चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नाईक तलाव परिसर सध्या पोलिसांच्या कडक बंदोबस्तात असून वातावरण मात्र तणावपूर्ण आहे.
