Nashik Farmer Death Cases: संकटग्रस्त शेतकऱ्यांसाठी कालबाह्य योजनांऐवजी नव्याने प्रभावी योजना राबविण्याची गरज यानिमित्ताने अधोरेखित झाली आहे.
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या एवढ्या मोठ्या संख्येने घटना घडल्याने शासकीय पातळीवर देखील हा चिंतेचा विषय ठरला आहे. शासकीय पातळीवरून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविल्या जात असूनही, शेतकरी आत्महत्येच्या घटनांचा आलेख थांबलेला नाही. नाशिक विभागात जानेवारी ते नोव्हेंबर २०२५ या अकरा महिन्यांच्या कालावधीत शेतकरी आत्महत्येच्या ३८२ घटना घडल्या, ही बाब चिंताजनक आहे. सर्वाधिक आत्महत्येच्या घटना जळगाव जिल्ह्यात, तर त्याखालोखाल १०१ इतक्या शेतकरी आत्महत्येच्या घटना अहिल्यानगर जिल्ह्यात घडल्या आहेत. धुळे जिल्ह्यातदेखील शेतकरी आत्महत्येच्या ८४ घटना घडल्या आहेत.
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासकीय पातळीवरून मदत केली जाते. आतापर्यंत विभागात १८९ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदतीचे प्रस्ताव पात्र ठरले असून, ११३ शेतकऱ्यांचे प्रस्ताव जिल्हास्तरीय समितीने केलेल्या चौकशीत अपात्र ठरले आहेत. ८० प्रस्ताव अद्याप चौकशीच्या प्रक्रियेत आहेत. जळगाव जिल्ह्यात जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि जुलै या महिन्यांत, तर अहिल्यानगर जिल्ह्यात जुलै ते नोव्हेंबर या महिन्यांत आत्महत्येच्या घटना जास्त घडल्या आहेत. धुळे जिल्ह्यातही जून, सप्टेंबर या महिन्यांत शेतकरी आत्महत्यांचा आलेख उंचावलेला दिसतो.
Nashik News: मला माफ करा, मी… इतकं लिहून नाशकात मनपा कर्मचाऱ्याने जीव दिला, प्रकरण काय?
नाशिक जिल्ह्यात आत्महत्येच्या घटनांना ब्रेक
गेल्या अकरा महिन्यात नाशिक जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येच्या १३ घटना नोंद झाल्या. या जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येच्या घटनांत घट आल्याची समाधानकारक बाब आहे. या जिल्ह्यातही अवकाळीसारख्या संकटाने थैमान घातले होते. मात्र, शेतकऱ्यांनी या संकटात आपले मनोबल खचू दिले नाही. शेतकरी हितासाठीच्या शासकीय योजना अजून प्रभावीपणे राबविल्या गेल्यास शेतकऱ्यांना आपत्ती काळात मदतीचा हात मिळू शकणार आहे.
