Maharashtra Politics: ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगर परिषदांचा निवडणूक प्रचार शिगेला पोहोचला आहे. विविध शहरांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मित्रपक्षांमध्येच लढत होत आहे.
ठाण्यातील अंबरनाथ, बदलापूर या शहरांमध्ये भाजप आणि शिवसेना हे मित्रपक्ष एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. तिथे शिवसेना (उबाठा)-मनसे, काँग्रेसकडूनही उमेदवार देण्यात आले आहेत. परंतु, येथील नगराध्यक्षपदांच्या निवडणुकीसाठी रस्सीखेच सुरू आहे. या भागांत शिवसेना आणि भाजपकडून बड्या नेत्यांच्या प्रचारसभा घेण्यात आल्या असल्या तरी शिवसेना (उबाठा) पक्षाच्या स्थानिक नेत्यांसाठी कोणत्याही वरिष्ठ नेत्याने हजेरी लावलेली नाही. शिवसेना (उबाठा) नेत्या सुषमा अंधारे यांची एकमेव सभा वगळता या भागांत पक्षाच्या बड्या नेत्यांनी पाठ फिरवल्याचे दिसते.
Eknath Shinde: अन्याय सहन करणार नाही! कार्यकर्त्यांवरील तक्रारींवरुन एकनाथ शिंदेंचा पोलिसांना इशारा
पालघरमधील जव्हार, पालघर, डहाणू या नगर परिषदांमध्येही भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर सभा घेतल्या. ‘अहंकारी रावणाची लंका जळाली होती’, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी डहाणूमध्ये भाजपवर केली होती. त्यावर, मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रचारसभेत कोणावरही टीका करणार नसल्याचे सांगत आपण लंकेत नव्हे, तर भारतात राहतो, असे प्रत्युत्तर दिले होते. या शहरांमध्ये शिवसेना, भाजपकडून प्रचाराचा झंझावात सुरू असताना महाविकास आघाडीचा प्रचार मात्र संथगतीने सुरू आहे. जव्हार नगर परिषदेमध्ये शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी (शप) पक्षाचे उमेदवार असतानाही महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या जाहीर सभांची वानवा जाणवली.
सेना-राष्ट्रवादीत संघर्ष
रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी या सत्ताधारी पक्षांतील स्थानिक नेत्यांमध्ये प्रचारात संघर्ष दिसून आला. राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांचे वर्चस्व असलेल्या या भागात त्यांच्याविरोधात शिवसेनेचे भरत गोगावले यांच्यासह स्थानिक आमदार उभे ठाकले आहेत. इथे राष्ट्रवादीकडून शिवसेनेच्या कोंडीचे प्रयत्न सुरू आहेत.
Nashik Politics: रात्र थोडी, सोंगे फार! उमेदवारांकडून नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराला वेग
कोकणातही धुमशान
रत्नागिरीमध्ये महायुती एकत्र असली तरी सिंधुदुर्गातील राणे बंधूंच्या निमित्ताने शिवसेना-भाजपमधील संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या भागांत विशेष लक्ष दिले असून, प्रचारदौरे केले आहेत. शिवसेनेकडून मंत्री उदय सामंत यांनी प्रचाराची धुरा सांभाळली आहे. काही ठिकाणी एकत्र, तर काही ठिकाणी विरोधात, असा भाजप-शिवसेनेचा प्रचार सुरू आहे. शिवसेना (उबाठा) पक्षाकडून भास्कर जाधव, विनायक राऊत यांच्याकडून पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार सुरू असला तरी या दोन नेत्यांमधील वादामुळे प्रचाराला प्रभावी दिशा मिळाली नसल्याचे दिसते.
