• Sun. Mar 8th, 2026
    ‘रक्षाविसर्जनाला वेळेत का आला नाही?’, उशिरा पोहोचल्यानं नातेवाईकांमध्ये बेदम मारहाण; कोल्हापुरात खळबळ

    Kolhapur Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच कोल्हापुरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं शहरात खळबळ उडाली आहे.

    कोल्हापूर पंचगंगा स्मशानभूमी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील पंचगंगा स्मशानभूमीत काल बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास रक्षाविसर्जनासाठी जमलेल्या नातेवाइकांत क्षुल्लक कारणावरून तुंबळ हाणामारी झाली. ‘रक्षाविसर्जनाला वेळेत का आला नाही?’ या प्रश्नावरून सुरू झालेला वाद क्षणात वाढत गेला आणि तिरडीच्या काठ्यांनी झालेल्या मारहाणीपर्यंत पोहोचला. या घटनेत इचलकरंजी येथील चौघेजण गंभीर जखमी झाले असून स्मशानभूमीत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झालं होतं.

    या झटापटीत विकास रामचंद्र गेजगे (वय 55), निवास रामचंद्र गेजगे (वय 50), सुनंदा दगडू पारसे (वय 65) आणि पूजा दगडू पारसे (वय 35, सर्व जखमी रा. इचलकरंजी) हे गंभीर जखमी झाले. जखमींवर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

    Maharashtra Timesराजकारणात खळबळ उडवून देणारी बातमी! ‘आमदार संतोष बांगर यांच्या घरी पहाटे 100 पोलिसांची धाड’, हेमंत पाटील यांची माहिती

    रक्षाविसर्जनासाठी उशिरा आल्यानं वाद

    गेजगे यांची बहीण अलका बाळू करडे (वय 60, रा. जरगनगर) यांचे 25 नोव्हेंबर रोजी सायंकाळी निधन झाले होते. मंगळवारीच त्यांच्यावर पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पार पडले. बुधवारी सकाळी सुमारे 11.15 वाजता रक्षाविसर्जनासाठी इचलकरंजीहून त्यांचे भाऊ आणि इतर नातेवाईक आले. त्यावेळी मृत करडे यांच्या नणंदेच्या मुलांनी आणि काही नातेवाइकांनी ‘रक्षाविसर्जनाला वेळेत का आला नाही?’ अशी विचारणा केली. यावरून वाद निर्माण झाला.

    तिरडीच्या काठ्यांनी डोकी फोडली

    वाद वाढताच दोन्ही बाजूंमधील संताप उफाळून आला आणि हाणामारी झाली. अंत्यसंस्कारासाठी वापरलेल्या तिरडीच्या काठ्या हाती घेऊन दोन्ही बाजू एकमेकांवर तुटून पडल्या. काहींची डोकी फुटली, कपडे फाटले आणि स्मशानभूमीत पळापळ उडाली. उपस्थितांनी प्रसंगावधान दाखवून स्थिती नियंत्रणात आणली. या घटनेनंतर निवास गेजगे यांनी वैभव राजू पाटील, शुभम पाटील, नीलेश करडे आणि रेश्मा दत्ता भजनावळे यांच्याविरोधात मारहाणीची तक्रार लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात दिली आहे. पोलिसांनी प्राथमिक चौकशी सुरू केली असून सविस्तर तपासानंतर आवश्यक ती कारवाई करण्यात येणार आहे.

    Maharashtra TimesNashik News : चंपाषष्टी सोहळ्यात हृदयद्रावक घटना; नाशिकमध्ये बारागाड्याखाली आल्यानं तरुण भाविकाचा दुर्दैवी मृत्यू

    स्मशानभूमीतील वातावरण तणावपूर्ण

    दरम्यान अंत्यसंस्कारासारख्या शांत आणि शोककाळातील विधीवेळी घडलेली ही घटना ऐकणाऱ्यांनाही अस्वस्थ करणारी ठरली. उपस्थित नागरिकांपैकी काहींनी या प्रकाराची निंदा करत अशा ठिकाणी नातेवाईकांतील वाद मिटवण्याऐवजी तो वाढविणे अत्यंत दुर्दैवी असल्याचे मत व्यक्त केले.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा