हिंगोली जिल्ह्यातून मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेनेचे आक्रमक आमदार संतोष बांगर यांच्या घरावर आज पहाटे 100 पोलिसांनी धाड टाकल्याची माहिती शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार हेमंत पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे हिंगोलीच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
“हिंगोली आणि कळमनुरी या दोन्ही शहरांमध्ये शिवसेनेची ताकद आहे. दोन्ही शहरांमध्ये शिवसेनेचा भगवा फडकणार आहे. दोन्ही ठिकाणी शिवसेनेचे नगराध्यक्ष होणार आहेत. कार्यकर्ते अत्यंत उत्तम पद्धतीने काम करत आहेत. पण समोरच्यांची पायाखालची वाळू घसरायला लागली आहे हे या निवडणुकीच्या निमित्ताने लक्षात आलं आहे”, असं हेमंत पाटील म्हणाले.
“आमदार संतोष बांगर यांच्या घरावरती सकाळी पाच ते साडे पाच वाजता 100 पोलिसांनी जावून झाडाझडती घेतली. त्यांची 75 ते 80 वर्षांची आई आजारी असते. ती घरात असताना, पत्नी, लहान मुलं घरात असताना, अशा पद्धतीने घरातील सामान काढून बघणं, कपाटातील सामान काढून बघणं, हे अतिशय वाईट पद्धतीने झालं आहे”, अशी खंत हेमंत पाटील यांनी व्यक्त केली.
सर्वात मोठी बातमी! उज्ज्वला थिटे यांची याचिका कोर्टाने फेटाळली, अनगर नगरपंचायतीचा तिढा सुटला
“खरंतर आमदार पद हे संविधानिक पद आहे. त्याला संविधानिक दर्जा आहे. अशा संविधानिक पदाच्या कार्यकर्ता असलेल्या आमदारावर धाड टाकायची असेल तर विधानसभा अध्यक्षांची परवानगी घ्यावी लागते. त्या पद्धतीची कोणतीही परवानगी पोलीस अधिकाऱ्यांनी घेतलेली नाही. मी स्वत: विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयात संपर्क साधला. त्यांनी सांगितलं की, कुठल्याही प्रकारचा मेल आलेला नाही. कुठल्याही प्रकारची परवानगी घेतलेली नाही. परवानगी न घेता अशाप्रकारची धाड कुणाच्या सांगण्यावर टाकली?”, असा सवाल हेमंत पाटील यांनी केला.
“इथल्या स्थानिक आमदारांच्या दबावाखाली येऊन इथल्या पोलिसांनी जी कारवाई केली आहे त्याची गंभीर दखल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. तसेच आम्ही दोन्ही जिल्ह्याचे आमदार या कारवाई संदर्भात बोलण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहोत”, अशी माहिती हेमंत पाटील यांनी दिली.
“राज्यात आम्ही सत्तेत समान वाटेदार आहोत. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर आहेत. अशावेळेस जो काही स्थानिक आमदाराचा दबाव पोलिसांवर आहे. पोलीस कशाप्रकारे स्थानिक आमदाराच्या दबावात राहून काम करतात, याची माहिती आम्ही मुख्यमंत्र्यांना देणार आहोत”, अशीदेखील माहिती त्यांनी दिली.
मोदी सरकारकडून महाराष्ट्राला 2 मोठे गिफ्ट, मुंबई आणि पुणेकरांना थेट मोठा फायदा होणार
“एखाद्या आमदाराच्या घरावर अतिरेक्यासारखी, गुंडासारखी झाडाझडती घेतली जात असतील तर ते कुणालाही सहन होणार नाही. कुणालाही राग येईल. अशावेळेस समोरुन आरोप होत आहेत. त्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं जात आहे. माझी दोघांना विनंती आहे. निवडणूक काही काळापुरता आहे. लोक आपल्याकडे बघत असतात. आपण आपली पातळी न सोडता टीका-टीप्पणी केली पाहिजे. मी संतोष बांगर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बोलणार आहे”, असंदेखील ते म्हणाले.
