• Sun. Mar 8th, 2026

    Pune News: पुण्यात अपघात टाळण्यासाठी प्रशासनाचा मोठा निर्णय; मंगळवारपासून वाहतुकीचे नवे नियम, पण वाहनचालकांना वेगळीच चिंता!

    Pune News: पुण्यात अपघात टाळण्यासाठी प्रशासनाचा मोठा निर्णय; मंगळवारपासून वाहतुकीचे नवे नियम, पण वाहनचालकांना वेगळीच चिंता!

    Pune Accident News: पुण्यातील कात्रज-देहूरोड बायपासवर नवले पूल चौकाजवळ भीषण अपघातानंतर नवा निर्णय घेण्यात आला आहे. 25 नोव्हेंबरपासून लागू होणाऱ्या या निर्णयामुळे अपघात कमी होण्याची अपेक्षा आहे, मात्र वाहतूक कोंडी वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

    पुण्यात मंगळवारपासून वाहतुकीचे नवे नियम(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    पुणे: पुण्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या भीषण अपघाताच्या पार्श्वभूमीवर शहरातील कात्रज-देहूरोड बायपासवरील भूमकर चौक ते नवले पूल चौकादरम्यान वाहनांसाठीची वेगमर्यादा ताशी 60 किलोमीटरवरून ताशी 30 किलोमीटर करण्यात आली आहे. 25 नोव्हेंबरपासून लागू होणाऱ्या या नवीन नियमामुळे अपघातांचे प्रमाण कमी होण्याची अपेक्षा आहे. परंतु यामुळे वाहतूक कोंडी वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. तीव्र उतार आणि सततच्या वर्दळीमुळे हा मार्ग अपघातांसाठी ओळखला जातो.

    पुणे शहरातील या मार्गावर वारंवार होणारे अपघात व नुकत्याच झालेल्या एका भीषण अपघातानंतर पुणे वाहतूक पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर, नवले पूल परिसरात विविध उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला. याच अंतर्गत, वाहतूक पोलिसांनी सर्व प्रकारच्या वाहनांसाठी वेगमर्यादा निम्म्याने कमी केली असून वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर सीसीटीव्ही व स्पीडगनद्वारे कारवाई केली जाणार आहे.

    नवीन वेगमर्यादेने अपघात कमी होतील अशी अपेक्षा असली तरी, वाहतूकदारांकडून काही चिंताही व्यक्त केल्या जात आहेत. या रस्त्याचा उतार तीव्र असल्यामुळे वाहनांचा वेग आपोआप वाढतो. मोठ्या ट्रक व ट्रेलरसारख्या जड वाहनांना ताशी 30 किलोमीटरचा वेग कायम ठेवणे तांत्रिकदृष्ट्या कठीण होऊ शकतं. यामुळे चालकांना वारंवार ब्रेक लावावे लागतील, ज्यामुळे ब्रेक गरम होणे, निकामी होणे किंवा वाहनावरील नियंत्रण सुटणे यासारखे धोके वाढू शकतात. उतारावर इतका कमी वेग बंधनकारक केल्यास तांत्रिक अडचणी व वाहतूक कोंडी वाढण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

    वाहतूकदार महासंघाचे वरिष्ठ पदाधिकारी डॉ. बाबा शिंदे यांनी सांगितले की, “वेगमर्यादेमुळे वाहनांचा वेग कमी होईल. मात्र तीव्र उतार, जड वाहतूक व वाहनांच्या तांत्रिक मर्यादा लक्षात घेता, वाहतूक कोंडी व वाहनांवरील नियंत्रण गमावण्याचे नवीन धोकेही निर्माण होतील. उताराच्या रचनेशी संबंधित दीर्घकालीन अभियांत्रिकी सुधारणा व वाहतूक व्यवस्थापनाच्या इतर उपाययोजना केल्यानंतर परिस्थिती प्रभावीपणे नियंत्रणात येईल,” असं शिंदे म्हणाले.

    दरम्यान, नव्या निर्णयाबाबत अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनीही मत मांडलं आहे. “नवले पूल परिसरात पाहता वेगावर मर्यादा आणणं गरजेचं होतें. ताशी 30 किलोमीटर ही वेगमर्यादा तीव्र उताराच्या भागात केलेली नाही. शहराशी जोडलेल्या भागातच ही वेगमर्यादा असेल आणि तिथे तीव्र उतार नाही. या भागात पुरेसे सेवा रस्ते व पायाभूत सुविधा निर्माण झाल्यानंतर चित्र वेगळे असेल. वेगमर्यादेबाबत सूचना असल्यास जरूर कळवाव्यात,” असं आवाहन पाटील यांनी केलं आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा