• Sun. Mar 15th, 2026
    Tamhini Ghat Accident: भीषण! पुण्यावरून कोकणात जाताना भीषण अपघात; थार 500 फूट दरीत कोसळली, घाटात 4 जणांची बॉडी आढळली

    Raigad Tamhini Ghat Accident News : रायगडच्या ताम्हिणी घाटात थार कारला भीषण अपघात झाला असून चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तीव्र वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी 500 फूट खोल दरीत कोसळली असल्याची माहिती असून मृतदेह शोधण्यासाठी पोलिसांकडून ड्रोनची मदत घेतली जात आहे.

    पुण्यावरून कोकणात जाताना भीषण अपघात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    रायगड: ताम्हिणी घाटात थार कारला भीषण अपघात झाला असून या अपघातात चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पुणे-माणगाव मार्गावर मंगळवारी हा अपघात झाल्याची माहिती असून थार गाडी एका तीव्र वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट 500 फूट खोल दरीत कोसळली. या घटनेने जिल्हा हादरला असून, मृतदेह शोधण्यासाठी पोलिसांना ड्रोनची मदत घ्यावी लागत आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नसले तरी, चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, कोकणात गेलेल्या पर्यटकांशी संपर्क होत नसल्याने काल बुधवारी त्यांच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. तेव्हापासून पोलिसांकडून या थार कारचा शोध सुरू होता. मात्र घाटात शोधकार्य करताना अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे पोलिसांनी ड्रोनची मदत घेतली. अखेर आज सकाळी ताम्हिणी घाटातील दरीत चक्काचूर झालेली थार आणि चार जणांचा मृतदेह आढळून आला आहे. आणखी दोन जण बेपत्ता असल्याचे समजते.

    ताम्हिणी घाटातील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटताच थार गाडी थेट खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. धोकादायक उतार, खोल दरी आणि चेंदामेंदा झालेल्या वाहनाचे अवशेष पाहून घटनास्थळी उपस्थित नागरिकही हादरले. मृतदेह शोधण्यासाठी पोलिसांना ड्रोनची मदत घ्यावी लागत आहे. हा अपघात अत्यंत गंभीर असून, दरी खोल आणि दगडांनी भरलेली असल्याने मृतदेह बाहेर काढण्याचे आव्हान बचाव पथकासमोर आहे. पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांनी सांगितलं की, “अपघाताचे नेमकं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही. मात्र प्रथमदर्शनी चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यानेच गाडी दरीत कोसळली असावी. ड्रोनद्वारे परिसराची तपासणी सुरू असून चार मृतदेह दिसून आले आहेत. ते वर आणण्याचे काम सुरू आहे. बचाव पथक दोरखंड, क्रेन आणि इतर उपकरणांच्या मदतीने हे रेस्क्यू ऑपरेशन करत आहे. वाहनात आणखी प्रवासी होते का, याचा तपासही सुरू आहे.”

    दरम्यान, ताम्हिणी घाट हा निसर्गरम्य दृश्यांसाठी ओळखला जातो, पण येथील अरुंद, घसरडे आणि वळणावळणाचे रस्ते अपघातांना आमंत्रण देतात. धुक्यामुळे कमी होणारी दृश्यमानता, वाहनचालकांची बेपर्वाई आणि रस्त्यांची खराब स्थिती ही अपघातांची प्रमुख कारणं ठरत आहेत. या घटनेनंतर पुन्हा एकदा ताम्हिणी घाटातील सुरक्षा व्यवस्था आणि वाहतुकीच्या नियमांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून या भीषण अपघातामुळे चार कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलीस प्रशासनाकडून मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून या अपघाताचा सखोल तपास केला जात आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा