Pune Road Accident: नवले पूल येथील भीषण अपघाताची घटना ताजी असतानाच हिंजवडी येथे डंपरने चिरडून एका दुचाकीस्वार तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यामुळे जड वाहनांमुळे होणाऱ्या अपघातांचा गंभीर प्रश्न पुन्हा समोर आला आहे.
पुण्यात लोणीकंद, लोणी काळभोर परिसरातही अशीच भीषण अपघात मालिका सुरूच असताना गेल्या तीन वर्षांचा आढावा घेतला असता जड वाहनांखाली तब्बल २४५ जणांचा मृत्यू झाला. या अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी जड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध लागू केले असले तरी मृतांच्या संख्येत मोठी घट दिसत नाही. तीन वर्षांत शहरातील प्राणांतिक अपघातांत एकूण ९४१ मृत्यू झाले, त्यापैकी २४५ मृत्यू जड वाहनांखाली झाले.
२०२५ मध्ये किंचित घट; परंतु धोका कायम
यंदाच्या वर्षात (ऑक्टोबरपर्यंत) जड वाहनांमुळे झालेल्या प्राणांतिक अपघातांत किंचित घट दिसते. वाहतूक पोलिसांनी घातलेल्या निर्बंधांमुळे ही घट झाल्याचे मानले जात आहे. मात्र, त्याच कालावधीत मृतांची संख्या ५९ असल्याने केवळ निबंध पुरेसे नसून अधिक कठोर उपाययोजना, तपासणी, मार्ग नियोजन आणि काटेकोर अंमलबजावणीची गरज असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले.
पुणे-मिरज मार्गावर रेल्वे सुसाट; संपूर्ण मार्गावरील २८० किलोमीटरचे दुहेरीकरणाचे काम पूर्ण, वेग वाढणार
अवजड वाहतुकीवर निर्बंध घालताना वाहतूक पोलिसांनी खालील उपाययोजना केल्या
-अवजड वाहनांसाठी विशिष्ट मार्गांची आखणी
-३३ रस्त्यांवर अवजड वाहनांना दिवसा पूर्णतः बंदी
-जड वाहनांचे परवाने व वाहतूक नियम यांचे नियमित निरीक्षण
-नियमभंग करणाऱ्या जड वाहनांच्या चालकांवर गुन्हे दाखल
-प्राणांतिक अपघात प्रकरणात जड वाहनाच्या मालकांवर गुन्हे दाखल करण्यासह वाहन जप्तीची कारवाई

