• Sat. Mar 7th, 2026
    भाईंबाबत सबुरी, आता दादांची बारी; भाजपने जाळं फेकलं, एक-दोन नव्हे, दहा बडे नेते ‘घड्याळ’ सोडणार

    NCP leaders to join BJP : शिंदेंच्या शिवसेनेनंतर भाजपने आपला मोर्चा अजित पवार यांचे होम ग्राउंड असणाऱ्या पिंपरी चिंचवडकडे वळवला असून यावेळेस टार्गेट सुद्धा अजितदादाच आहेत.

    देवेंद्र फडणवीस-अजित पवार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    पुणे : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी महायुतीमध्ये संघर्ष गेले काही दिवसांपासून तीव्र झालेला पाहायला मिळत आहे. सत्तेमध्ये सहभागी असणारे भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेना हे एकमेकांच्या पक्षातील नेत्यांना आपल्याकडे घेण्यासाठी सगळी ताकद पणाला लावत आहेत. याच संघर्षामुळे महायुतीमध्ये मिठाचा खडा पडल्याचे चित्र सध्या दिसत आहे. याच फोडाफोडीमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली नाराजी थेट दिल्ली दरबारी अमित शहा यांच्यासमोर मांडली होती. आता शिंदेंच्या शिवसेनेनंतर भाजपने आपला मोर्चा अजित पवार यांचे होम ग्राउंड असणाऱ्या पिंपरी चिंचवडकडे वळवला असून यावेळेस टार्गेट सुद्धा अजित पवारच असणार आहेत.

    पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीच्या जमीन गैरव्यवहार प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार ) बॅकफूटला गेल्याचे चित्र दिसत असताना, आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला त्यांच्याच होमग्राउंडवर धक्का देण्यासाठी भाजपाने सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले आहेत. शहरभर शत-प्रतिशत भाजपाचे ध्येय गाठण्यासाठी भाजपात राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांपासून माजी नगरसेवकांपर्यंत सर्वांना सामील करून घेण्याचे प्रयत्न वेगाने सुरू आहेत. पिंपरी चिंचवडच्या राष्ट्रवादीच्या जवळपास 10 माजी नगरसेवकांसोबत भाजपच्या नेत्यांनी संपर्क केल्याची माहिती आहे.

    महापालिका निवडणुका जवळ येताच राजकीय वातावरण तापू लागले असून, भाजप आणि राष्ट्रवादी स्वतंत्र लढत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर फोडाफोडीचे राजकारण उफाळून आले आहे. 2017 मध्ये भाजपाने 77 जागांवर दणदणीत विजय मिळवला होता, तर राष्ट्रवादी 32 जागांवर विजयी झाली होती. पिंपरी-चिंचवडमध्ये सत्ता मिळवल्यानंतर दोन्ही पक्षांतील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. याच पार्श्वभूमीवर नगरसेवकांची शंभरी पार करण्याचे लक्ष भाजपाने ठेवले असून, त्यासाठी तगडे चेहरे दाखल करण्याची मोठी मोहीम हाती घेण्यात आली आहे.
    Maharashtra TimesNilesh Rane : ठाकरेंच्या शिलेदारासाठी शिंदेसेना मैदानात; रक्ताचं पाणी करुन जिंकायचंय, भाजपविरोधात नीलेश राणेंचा एल्गार
    पार्थ पवार यांच्या कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणाची चर्चा वाढल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये संभ्रमाचे आणि निरुत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे भाजपाच्या नेत्यांचा दावा आहे. दुसरीकडे शहरातील भाजपाचे आमदार आणि नुकत्याच मिळालेल्या बिहार निवडणुकीतील मोठ्या विजयामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवीन ऊर्जा संचारली आहे. पक्षाला सध्या अनुकूल वातावरण असल्याने अनेक इच्छुक तिकीटासाठी मैदानात उतरले आहेत.

    भाजपाचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी सांगितले की, महापालिकेत शत-प्रतिशत भाजपा करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय न होऊ देता अधिकाधिक सक्षम उमेदवार उभे करण्याचा आमचा प्रयत्न आहे. राष्ट्रवादीच्या दहाहून अधिक माजी नगरसेवकांशी चर्चा सुरू असून त्यांनी भाजपात येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. काटे यांच्या वक्तव्यामुळे भाजप राष्ट्रवादीचा संघर्ष टोकाला गेला आहे.
    Maharashtra TimesPrajakta Patil : उज्ज्वला थिटे अनगरला आल्या, तर मी… राजन पाटलांच्या सूनबाईंची पहिली प्रतिक्रिया, प्राजक्ता म्हणतात, गावातून त्यांना कोणी…
    महायुती तुटल्यामुळे भाजपाकडून 128 पैकी सर्वच जागांवर उमेदवार देण्याचा पर्याय खुला झाला आहे. अलीकडे झालेल्या अंतर्गत सर्व्हेतही भाजपाला अनुकूल वातावरण असल्याची चर्चा आहे. मात्र 77 जागांचा आकडा ओलांडून शंभरी पार करण्यासाठी अजून काही बलाढ्य उमेदवारांची गरज असल्याने राष्ट्रवादीतील ‘इलेक्टिव्ह मेरिट’ असणाऱ्या चेहऱ्यांना भाजपात आणण्याचे नियोजन सुरू आहे.

    विशेषत: चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपाचा आमदार असल्याने या भागातील राष्ट्रवादीतील अनेक माजी नगरसेवक भाजपाच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. 2017 मध्ये जसे अनेक इच्छुकांनी भाजपाच्या लाटेत उडी घेतली होती, तसाच पॅटर्न पुन्हा दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
    Maharashtra TimesPrithviraj Chavan : ठाकरेंच्या वकिलांची कोर्टात मोठी चूक, पृथ्वीराज चव्हाणांचं थेट मुद्द्यावर बोट, ते गप्प बसले आणि एका मिनिटात…
    दरम्यान, तिकीटासाठी 32 प्रभागांमध्ये मोठी स्पर्धा सुरू असून स्थानिक निष्ठावंतांना संधी द्यावी, अशी कार्यकर्त्यांची मागणी कायम आहे. जर राष्ट्रवादीतील नेत्यांना आयात करून तिकिटे दिली गेली, तर भाजपाच्या आतून नाराजी उसळू शकते. त्यामुळे ज्या प्रभागांमध्ये भाजप तुलनेने कमकुवत आहे, तिथेच ‘ऑपरेशन लोटस’ राबवण्याचा विचार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश सतीश बेंद्रे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मटासोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांनी झेविअर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत एबीपी माझा, टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे… आणखी वाचा