Navi Mumbai News : महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे मनसे कार्यकर्त्यांकडून अनावरण करण्यात आले आहे.
नेरूळमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपतींचा पुतळा सहा महिन्यांपूर्वी बसवण्यात आला. मात्र महापालिकेच्या वतीने या पुतळ्याचे अनावरण केले जात नव्हते. रविवारी दुपारी मनसे नेते अमित ठाकरे नवी मुंबईत आले असताना, त्यांनी कापडात गुंडाळून ठेवलेला हा पुतळा पाहिला. या कापडावरही धूळ जमा झाली होती. यावेळी पुतळ्यावरील कापड काढून पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
पोलिसांनी अमित ठाकरे यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र मनसे कार्यकर्त्यांनी या पुतळ्याचे अनावरण केले. महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता हे अनावरण करण्यात आले आहे. महापालिकेकडून रीतसर या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार होते, असे पालिकेने स्पष्ट केले आहे .
‘इतके दिवस हा पुतळा अशा अवस्थेत आहे. म्हणून पुतळ्याचे अनावरण केले आयुष्यातील पहिला गुन्हा महाराजांसाठी दाखल होत असेल, तर मला अभिमानच वाटेल,’ अशी प्रतिक्रिया अमित ठाकरे यांनी दिली.
Thane News : हुल्लडबाजी करत बाईक रॅली, शिंदेंच्या होमपीचवर राडा, ‘रिलस्टार’ पदाधिकाऱ्यावर पोलिसांचा बडगा
मनसेची प्रतिक्रिया
नवी मुंबई मनसे अध्यक्ष गजानन काळे म्हणाले की, नेरुळ चौकात सुमारे ४६ लाख रुपये खर्चून बांधलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याची मागणी करण्यासाठी त्यांनी गेल्या वर्षी फेब्रुवारीपासून नवी मुंबई महापालिकेशी वारंवार संपर्क साधला होता. परंतु संबंधित महापालिका अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत होते, कदाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीची वाट पाहत होते. पुतळ्याला झाकण्यासाठी वापरलेले कापड घाणेरडे असल्यामुळे तो शिवरायांच्या पुतळ्याचा अपमान ठरत होता. म्हणून अमित ठाकरे यांनी पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी पुढाकार घेतला आणि तो पुतळा स्वतः धुतला.
Crime News : भाजप युवा मोर्चा उपाध्यक्षांची बॉडी पुलाजवळ सापडली, टेमकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर, दोन दिवसांपूर्वीच…
नवी मुंबई महापालिकेचे उत्तर
नवी मुंबई महापालिकेने प्रेस रिलीज जारी करून म्हटले आहे की, महापालिका प्रशासनाने नेरुळ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केले नाही. पुतळ्याभोवतीचे बांधकाम अद्याप पूर्ण झालेले नाही आणि ते अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे पुतळ्याची अधिकृत स्थापना लवकरच केली जाईल. संबंधित अधिकाऱ्यांची परवानगी न घेता आणि पूर्वसूचना न देता पुतळ्याचे अनावरण करणे कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून अत्यंत बेकायदेशीर आणि अनधिकृत आहे.

