• Sat. Mar 7th, 2026
    Nagpur News: ‘शरद पवारांवर टीका करण्याची पात्रता आहे का’? विखे पाटलांवर अनिल देशमुखांचा जोरदार पलटवार

    Anil Deshmukh on radhakrushna vikhe patil: शरद पवारांवर टीका करण्यापूर्वी स्वतःची पात्रता तपासावी असा टोला अनिल देशमुख यांनी राधाकृष्ण विखे पाटलांना लगावला आहे. विखे पाटलांनी सत्ता आणि पदासाठी निष्ठा गहाण ठेवली, तर पवारांची राष्ट्रवादीची ताकद निलेश लंके यांनी दाखवून दिली, असे देशमुख म्हणाले.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    जितेंद्र खापरे नागपूर: महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुरू असलेल्या अंतर्गत घडामोडींवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर “आता त्यांची राष्ट्रवादी संपली आहे” असे विधान केले होते. याच विधानावर माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.

    अनिल देशमुख म्हणाले, “राधाकृष्ण विखे पाटील यांची शरद पवारांवर टीका करण्याची पात्रता तरी आहे का? सत्ता आणि पदांसाठी नैतिकता, तत्त्व, निष्ठा गहाण ठेवून त्यांनी भाजपात प्रवेश केला. शरद पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद काय आहे, हे लोकसभा निवडणुकीत निलेश लंके यांनी दाखवून दिले आहे. त्यामुळे विखे पाटील यांनी प्रथम आपली उंची आणि पात्रता ओळखावी आणि मगच शरद पवारांवर वक्तव्य करावे.” असे अनिल देशमुख म्हणाले.

    Maharashtra TimesSolapur News: शिंदेंच्या शिवसेनेला मोठं भगदाड, भाजपची खेळी; 20 हजार शिवसैनिक फोडले, 55 शाखाप्रमुखांचे राजीनामे

    स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत युतीचे संकेत

    प्रदेशातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काका-पुतण्याची (शरद पवार – अजित पवार) एकत्रित भूमिका चर्चेत आहे. या संदर्भात अनिल देशमुख म्हणाले, “स्थानिक पातळीवर काँग्रेस, उद्धव ठाकरे गट आणि इतर मित्र पक्षांसोबत चर्चा करून युती करण्याची आमच्या पक्षाची भूमिका आहे. प्रत्येक जिल्ह्यातील नेत्यांना निर्णयाचे अधिकार देण्यात आले आहेत.”

    नागपूर जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीबाबत विचारले असता देशमुख म्हणाले, “अनेक इच्छुक उमेदवार आमच्याकडे आहेत. त्यामुळे योग्य उमेदवारांची निवड करण्याची प्रक्रिया सुरू आहे. काही ठिकाणी आघाडी करून कॉमन चिन्हावरही निवडणूक लढविण्याची तयारी आहे. निवडणूक आयोगाने ऑफलाइन प्रक्रिया सुरू केल्याने सर्व इच्छुक उमेदवार आहे आणि ज्यांना पक्षांनी होकार दिलेला आहे, ते फॉर्म भरण्याच्या कामाला लागलेले आहेत.”, असं देशमुखांनी सांगितलं

    भाजपवर घराणेशाहीचा आरोप

    नगराध्यक्ष निवडणुकांमध्ये भाजपकडून नेत्यांच्या घरच्यांना प्राधान्य दिल्याच्या मुद्यावरही देशमुखांनी टीका केली. ते म्हणाले, “भारतीय जनता पार्टी मोठा पक्ष असूनही बाहेर उमेदवार मिळत नाहीत काय? अनेक ठिकाणी भाजपचे मोठ्या नेत्यांनी आपल्या नातेवाईकांना तिकीट दिले आहे. त्यांना बाहेर उमेदवार मिळत नाही की काय मला समजत नाही, पण अनेक ठिकाणी अशा पद्धतीने त्यांनी आपल्या घरच्या लोकांना तिकीट दिले आहे असे दिसत आहे. असेही अनिल देशमुख म्हणाले.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा