• Sat. Jun 13th, 2026

    गर्भवती महिला बांधावरून पाय घसरून पडली अन् रुग्णालयात नेताच मृत्यू; बाळासोबत काय घडलं? कोल्हापुरातील घटना चर्चेत

    गर्भवती महिला बांधावरून पाय घसरून पडली अन् रुग्णालयात नेताच मृत्यू; बाळासोबत काय घडलं? कोल्हापुरातील घटना चर्चेत

    Kolhapur News: कोल्हापुरात ऊसतोडीसाठी आलेल्या एका गर्भवती मजूर महिलेचा पाय घसरून पडल्याने मृत्यू झाला. परंतु, तिच्या जन्माला आलेल्या नवजात बाळाला मायेची सावली मिळाली आणि त्याचा जीव वाचला आहे.

    गर्भवती महिला बांधावरून पाय घसरून पडली अन् रुग्णालयात नेताच मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर: ऊसतोडीसाठी परजिल्ह्यातून कोल्हापुरात आलेल्या गर्भवती मजूर महिलेच्या मृत्यूने एका गरीब कुटुंबावर काळाचा घाला झाला. त्यातही दुर्दैवी म्हणजे तिच्या पोटातील तान्ह बाळ जन्म घेताच आईच्या छत्रछायेपासून पोरकं झालं. आईच्या मृत्यूनंतरही तिच्या सातव्या महिन्यात जन्म घेतलेल्या नवजात बाळाने जगण्याची झुंज सुरू ठेवली. नवजात बाळाला दूध पाजण्यासाठी कोल्हापुरातील एक दूधआई पुढे आली अन् त्या नवजात बाळाला माणुसकीचा उबदार आशीर्वाद मिळाला. डॉक्टरांच्या देखरेखीखाली चार दिवसांच्या उपचारानंतर या बाळासह परिवाराला त्यांच्या मूळ गावी परत पाठवण्यात आलं आहे.

    जन्मतःच बाळ झालं पोरकं..
    सध्या सर्वत्र ऊसतोडीचा हंगाम सुरू आहे. बाहेरच्या जिल्ह्यातून ऊसतोड मजूर कोल्हापुरात दरवर्षी येत असतात. अशाच पद्धतीने कर्जाच्या परतफेडीचा आणि उदरनिर्वाहाचा मोठा ताण असणारे एक गरीब कुटुंब परजिल्ह्यातून ऊस तोडीसाठी कोल्हापुरात आले. यामध्ये एक गर्भवती महिला आपल्या पतीसह आली होती. ऊसतोडीच्या टोळीत आपल्या पतीसोबत काम करत दिवाळीचा सणही ऊसतोड मजुरांच्या टोळीतच या कुटुंबाने आनंदाने साजरा केला. अधूनमधून पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतात होणाऱ्या चिखलातच त्यांना काम करावे लागत असे. दिवसा उजेडी असो किंवा रात्रीच्या अंधारात चिखलाने माखलेल्या पायवाटेतूनच येजा करावी लागत असे. परंतु 6 नोव्हेंबरच्या दिवशी शेतातील चिखलातून चालताना अचानक या गर्भवती महिलेचा पाय घसरल्याने ती पोटावर पडली आणि असाहनीय प्रसूती वेदना सुरू झाल्या. तात्काळ रुग्णालयात नेल्यावर डॉक्टरांनी बाळाला वाचवले, परंतु आईला वाचवता आलं नाही. अतिरक्तस्त्रावामुळे या महिलेचा मृत्यू झाला.

    नवजात बाळाला दूधआईचा आधार
    मातेच्या निधनानंतर, या बाळाची प्रकृती चिंताजनक होती. डॉक्टरांच्या देखरेखीखाली बाळावर चार दिवस उपचार करण्यात आले. चार दिवस हे बाळ जीवनमरणाशी झुंज देत होते. यावेळी त्या बाळाला सर्वात जास्त गरज होती ती म्हणजे आईच्या दुधाची. याच दुधाच्या गरजेसाठी पुढे आल्या कोल्हापुरातल्या उद्यमनगर येथील गीता पाटील. दूधआई म्हणून पुढे आलेल्या गीता यांनी या अनोळखी बाळाला आपल्या बाळासारखे प्रेमाने दूध दिले. त्यांच्या या मायेच्या प्रेमाने नवजात बाळाला नवजीवन मिळाले आणि त्याच्या प्रकृतीत सुधार होऊ लागला.

    समाजसेवेचा हात पुढे
    बाळाची प्रकृती स्थिर झाल्यावर ते बाळ घरी आणले गेले आणि पुढील काळजीसाठी विविध समाजसेवी संस्था पुढे आल्या. या संस्थांनी तीन महिन्यांचे दूध पावडर, कपडे, पांघरूण, आणि अन्य आवश्यक साहित्यही या बाळाच्या ऊसतोड मजूर कुटुंबासाठी पुरवले. तसेच बाळाच्या सुरक्षिततेची सर्व पूर्वतयारी करून या कुटुंबाला त्यांच्या मूळ गावी सुरक्षितपणे पाठवण्याची व्यवस्था केली.

    दरम्यान, या घटनेतून ऊसतोड कामगारांची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती, तसेच महिलांसमोर असलेल्या आव्हानांचं भीषण आव्हान समोर आलं आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा