• Tue. Jun 16th, 2026
    Raigad News : अखेर त्या आईच्या मनात नेमकं काय चाललं होतं? एका निर्णयाने दोन चिमुकल्या दगावल्या, दोन मुलांची मृत्यूशी झुंज; स्वतः जन्मदातीही…

    माणगाव तालुक्यातील खरवली आदिवासी वाडी येथे एक धक्कादायक प्रकास समोर आला आहे. आईने केलेल्या कृत्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. आईने असं काही केलंय की, अंगावर काटा उभा राहतोय.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अमूलकुमार जैन, रायगड: रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील खरवली आदिवासी वाडी येथे घडलेल्या धक्कादायक घटनेने परिसर हादरून गेला आहे. एका महिलेने आपल्या चार मुलांना थंडपेयातून विष दिल्यानंतर स्वतःही विष प्राशन केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारात आईसह दोन मुलींचा मृत्यू झाला असून दोन मुलांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार, आशा जाधव (वय २९) यांनी आपल्या चार मुलांना थंडपेयातून विष दिले. त्यानंतर त्यांनी स्वतःही विष प्राशन केले. काही वेळातच सर्वांची प्रकृती बिघडल्याचे लक्षात आल्यानंतर स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. मात्र परिस्थिती गंभीर झाल्याने सर्वांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले.

    मुली-आई दगावली, दोन मुलं गंभीर

    या घटनेत आशा जाधव यांच्यासह त्यांची मुलगी नंदिनी जाधव (वय ७) आणि दुर्वा जाधव (वय ६) यांचा मृत्यू झाला. दोन चिमुकल्यांच्या मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान, अन्य दोन मुलांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्यावर माणगाव उपजिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

    घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून तपासाला सुरुवात केली आहे. या टोकाच्या निर्णयामागे नेमके काय कारण होते, याचा शोध घेतला जात आहे.

    कारणामागचा तपास सुरु

    कौटुंबिक वाद, आर्थिक अडचणी, मानसिक तणाव किंवा अन्य काही कारणांमुळे हे पाऊल उचलण्यात आले का, याचा सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. मात्र या संदर्भात पोलिसांनी अद्याप कोणतेही अधिकृत कारण स्पष्ट केलेले नाही.

    एकाच कुटुंबातील आई आणि दोन मुलींचा मृत्यू झाल्याने खरवली आदिवासी वाडीवर शोककळा पसरली आहे. नातेवाईक आणि ग्रामस्थांकडून दुःख व्यक्त केले जात असून, दोन मुलांसाठी सुरू असलेल्या जीवन-मृत्यूच्या संघर्षामुळे परिसरातील वातावरण अधिकच हळहळजनक झाले आहे.

    या प्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच या भीषण घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा