• Sun. Jun 14th, 2026
    Palghar News: शाळेत पोहोचायला दहा मिनिटं उशीर केला म्हणून अशी शिक्षा दिली की सहावीतली अंशिका जीवानिशी गेली, संतापजनक घटनेने महाराष्ट्र हादरला

    वसईतील श्री हनुमंत विद्या हायस्कूलमध्ये 13 वर्षीय अंशिका गौडला शाळेत उशिरा आल्याने शिक्षिकेने 100 उठाबशा काढण्याची शिक्षा दिली. या शिक्षेमुळे तिची तब्येत बिघडली आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    नवी मुंबई: महाराष्ट्राला हादरवून टाकणारी अतिशय धक्कादायक अशी घटना समोर आली आहे. बालदिनाचा उत्साह संपत नाही तोवर एका बालिकेचा मनाला चटका लावणारा दुर्देवी मृत्यू झाला आहे. एका 13 वर्षीय बालिकेला शिक्षिकेने 100 उठाबशा काढण्याची शिक्षा दिली, या शिक्षेमुळे विद्यार्थिनी जीवानीशी गेली आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहेच, त्याशिवाय संबंधित शिक्षिकेवर कारवाईची मागणीही जोर धरत आहे.

    नेमकं काय घडलं?शाळेमध्ये पोहचण्यासाठी दहा मिनिटे उशीर झाल्याचा राग शिक्षिकेला आला. राग अनावर न झालेल्या शिक्षिकेने विद्यार्थिनीला 100 उठाबशा काढण्याची भयावह शिक्षा ठोठावली. या जीवापेक्षा मोठ्या शिक्षेमुळे विद्यार्थीनीची तब्येतच बिघडली व तिला रुग्णालयात दाखल कराव लागलं, पण दुर्देवाने उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला. ही संतापजनक घटना वसई पश्चिममधील सातीवली परिसरातल्या श्री हनुमंत विद्या हायस्कूलमध्ये घडली आहे.

    Maharashtra Timesना ‘एसआयआर’ ना आणखी काही, ‘या’ एका कारणाने NDA ला मिळाला मोठा विजय, शरद पवारांनी बिहार निवडणूक निकालाचं केलं विश्लेषण

    मिळालेल्या माहितीनुसार या विद्यार्थीनीचे नाव अंशिका गौड आहे. ती फक्त 13 वर्षांची होती आणि सहावीत शिकत होती. 8 नोव्हेंबर रोजी अंशिका नेहमीप्रमाणे शाळेमध्ये पोहोचली. पण तिला दहा मिनिटं उशिर झाला होता. याच कारणाने शिक्षिकेने अशिकासह इतर उशिर झालेल्या विद्यार्थ्यांना वर्गाच्या बाहेर काढलं व उठाबशांची शिक्षा सुनावली. सर्व विद्यार्थी उठाबशा काढत राहिले. कोणी मध्येच थांबले. पण, घाबरुन गेलेल्या अंशिकानं सर्व 100 उठाबशा काढल्या. यातच तिची तब्येत बिघडली. दुसऱ्याच दिवशी तिला वसईमधल्या आस्था हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. याठिकाणाहून तिला मुंबईमध्ये हलवण्यात आलं कारण तिची तब्येत आणखीन बिघडत जात होती. पण शेवटी नको तेच घडलं आणि बालदिनालाच अंशिकाने प्राण सोडले.

    दरम्यान, हा प्रकार समोर आल्यानंतर मनसेने शाळेविरोधात तीव्र भूमिका घेत शाळेला टाळं ठोकलं आहे. शिक्षिकेवर गुन्हा दाखल झाल्याशिवाय शाळा उघडू देणार नाही, असा इशाला मनसेने दिला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या शाळेला मान्यताच मिळालेली नाहीये. कोणतीही अधिकृत मान्यता नसलेल्या या शाळेतील शिक्षिकेच्या भयंकर शिक्षेने एका निष्पाप मुलीचा जीव गेला. या प्रकारामुळे पालकांकडूनही तीव्र संताप व्यक्त केला जात आहे व कठोर शिक्षेची मागणी केली जात आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा