• Sat. Mar 14th, 2026
    अखेर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, युतीत लढण्याचा निर्णय, भाजपविरोधात एल्गार, नवीन समीकरणं राजकारण बदलणार

    Kolhapur Chandgad Nagar Panchayat : कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या या दोन्ही गटांमध्ये ऐतिहासिक एकीचा निर्णय घेण्यात आला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर : सध्या राज्यातील राजकीय वातावरण पाहिलं, तर कुठे फूट पडून एकाचे दोन पक्ष झाले आहेत, तर कुठे एकाच पक्षात गटातटाचं राजकारण सुरु आहे. तरीही आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता परिस्थितीनुसार काही ठिकाणी दोन पक्ष एकत्र येण्याची चिन्हं दिसत आहेत. अशीच परिस्थिती कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा आहे, तर दुसरा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार या नावाने ओळखला जातो. मात्र कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या या दोन्ही गटांमध्ये ऐतिहासिक एकीचा निर्णय घेण्यात आला आहे.

    डॉ. नंदाताई बाभुळकर (शरद पवार गट) आणि माजी आमदार राजेश पाटील (अजित पवार गट) यांनी एकत्र येऊन ‘राजर्षी शाहू विकास आघाडी’च्या नावाखाली निवडणुका युती करुन लढवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती गडहिंग्लज येथे पत्रकार परिषदेत मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.

    ही युती खास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्त्वाखाली झाली असून या बैठकीत दोन्ही गटांच्या नेत्यांनी पक्षाच्या एकात्मतेसाठी आणि विकासासाठी पुरोगामी विचारांनी एकत्र येण्याचे महत्त्व अधोरेखित केले. मंत्री हसन मुश्रीफ यांनी युतीमुळे चंदगड नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय निश्चित होईल, असाही विश्वास यावेळी व्यक्त केला. तसेच भाजप पुरस्कृत शिवाजी पाटील यांच्याविरुद्ध एकमताने लढा देण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.

    राजेश पाटील यांनी या युतीत काँग्रेसमधील अनेक कार्यकर्ते आणि सामाजिक नेत्यांचे समर्थन मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली. मतदारांना पुरोगामी आणि विकासात्मक पक्षाच्या धोरणांवर विश्वास वाटावा, यासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा असल्याचे दोन्ही नेत्यांनी सांगितले. दोघेही याआधी विधानसभा निवडणुकांत वेगळ्या गटांतून लढले होते, मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आता त्यांनी राजकीय भिन्नता बाजूला ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

    कोल्हापुरातील अन्य तालुक्यांमध्येही मतदार संघ आणि राजकीय खेळ बदलण्याच्या दिशेने गटस्तरीय चर्चा सुरू आहेत. गडहिंग्लजमध्ये भाजपसोबत संवाद सुरु असून, कागलमध्ये संजय बाबा घाटगे यांच्याशी चर्चा होण्याची माहिती आहे. मात्र मुरगूडमध्ये भाजपशी आघाडी करणे कठीण असल्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

    मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले की, या युतीमुळे राजकीय वातावरणात महत्त्वपूर्ण बदल घडून येतील आणि राष्ट्रवादीला चंदगडमध्ये निश्चित यश मिळेल. हा एक सकारात्मक निर्णय असून पक्षाची एकात्मता आणि विकासासाठी महत्त्वाचा आहे. या युतीमुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतच नव्हे, तर भविष्यातील राजकीय गणितातही कोल्हापूर जिल्ह्यात बरेच बदल घडून येण्याची शक्यता आहे. या नव्या समीकरणामुळे स्थानिक जनता आणि पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे

    दरम्यान या युतीने स्थानिक राजकारणाला नवीन दिशा दिली असून महायुतीसाठी हा निर्णय मोठा धक्का देईल, असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. तसेच यामुळे स्थानिक राजकारणात नवे समीकरण तयार होऊन अनेक नव्या आशा आणि अपेक्षा निर्माण होतील, हे मात्र नक्की.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश सतीश बेंद्रे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मटासोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांनी झेविअर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत एबीपी माझा, टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे… आणखी वाचा