• Sun. Aug 9th, 2026

    Mumbai News: सावरकर पुलाचे पाडकाम रद्द; सागरी किनारा मार्गासाठी ‘मोनोपाइल’ तंत्रज्ञानाद्वारे होणार नव्या पुलाची उभारणी

    Mumbai News: सावरकर पुलाचे पाडकाम रद्द; सागरी किनारा मार्गासाठी ‘मोनोपाइल’ तंत्रज्ञानाद्वारे होणार नव्या पुलाची उभारणी

    Mumbai News: सागरी किनारा मार्गाचा नवीन पूल ‘मोनोपाइल’ तंत्रज्ञान (एकल स्तंभ) वापरून उभारला जाणार आहे. यामुळे वीर सावरकर उड्डाणपूल तोडण्याची गरज भासणार नाही.

    savarkar bridge(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    सुशांत मोरे, मुंबई : वर्सोवा ते दहिसर सागरी किनारा मार्गातील नवीन पुलाच्या कामात गोरेगावमधील वीर सावरकर उड्डाणपूल (एमटीएनएल) अडथळा ठरत असल्याने तो पाडण्याचे नियोजन मुंबई महापालिकेने केले होते. मात्र आता हा उड्डाणपूल न पाडण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

    वीर सावरकर उड्डाणपूल एमटीएनएल उड्डाणपूल नावानेही ओळखला जातो. हा उड्डाणपूल रेडिसन हॉटेलपासून रुस्तमजी ओझोन परिसरापर्यंत आहे. या पुलाचे उद्घाटन सन २०१८मध्ये करण्यात आले होते. पुलाच्या बांधकामासाठी त्यावेळी २७ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला.
    Maharashtra TimesMumbai Local: मुंबईकरांनो, उद्या तिन्ही रेल्वेमार्गांवर ब्लॉक; दुपारी 4पर्यंत अनेक लोकल रद्द, वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा!
    वर्सोवा ते दहिसर सागरी किनारा मार्ग सहा टप्प्यांत होत आहे. माइंड-स्पेस ते दिंडोशी आणि पुढे गोरेगाव-मुलुंड लिंक रोडपर्यंत या मार्गाची जोडणी करण्यासाठी वीर सावरकर उड्डाणपूल पाडण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. या पट्ट्यात सागरी किनारा मार्गाचा पूल प्रस्तावित होता. सागरी किनारा मार्गाच्या पुलासाठी लागणारी जागा व अन्य तांत्रिक बाबी पाहता वीर सावरकर उड्डाणपूल पाडण्याशिवाय पर्याय नाही, अशी भूमिका महापालिकेने घेतली होती. त्याला स्थानिकांसह लोकप्रतिनिधींनी तीव्र विरोध केला होता.

    अखेर महापालिकेने यावर तोडगा काढला आहे. या उड्डाणपुलावरून सागरी किनारा मार्गाचा नवा पूल ‘मोनोपाइल’ तंत्रज्ञान वापरून उभारला जाणार आहे. यासाठी सागरी किनारा मार्गाचे काम पाहणाऱ्या कंपनीकडून आराखडा तयार करून तो तांत्रिक तपासणीसाठी लवकरच आयआयटीला सादर केला जाणार आहे.

    आयआयटीकडूनही सुरक्षित बाबी तपासून त्यावर अहवाल दिला जाणार आहे. या आधी सागरी किनारा मार्गाचा पूल बहुस्तंभ वापरून केला जाणार होता. त्यासाठी मोठ्या प्रमाणात जागेची आवश्यकता होती. यामध्ये प्रत्येक खांबाच्या खाली आधार देणारे चार किंवा त्यापेक्षा जास्त स्तंभ उभारण्यात येतात. परिणामी वीर सावरकर उड्डाणपूल पाडण्याशिवाय पर्याय नव्हता. आता हा पूल पाडला जाणार नाही. शुक्रवारी यासंदर्भात मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्यासोबत स्थानिक आमदार, माजी नगरसेवक व स्थानिकांची बैठक पार पडली.

    Maharashtra Timesमुंबईकरानो, स्वस्तात घर हवंय? छोटीशी चूक देखील महागात पडू शकते, वडाळ्यात 103 जणांनी कोट्यवधी गमावले
    मोनोपाइल तंत्रज्ञान काय ?
    मोनोपाइल तंत्रज्ञानात वीर सावरकर उड्डाणपुलाच्या दोन्ही टोकांना आणि बाजूंना एकल स्तंभ उभारले जातील. या पद्धतीमध्ये खालपासून वरपर्यंत एकच भक्कम खांब उभारण्यात येतो. त्यामुळे अत्यंत कमीत कमी खांबांचा वापर होऊन पूल उभारणी केली जाईल. खांबांची आकारणीही कमी असते. त्यामुळे कमी जागा व्यापली जाते.

    खर्च वाढण्याची शक्यता
    वर्सोवा ते दहिसर सागरी किनारा मार्गातील नवीन पूल माइंड-स्पेस ते दिंडोशी न्यायालय असा साडेचार किलोमीटरपर्यंत आहे. नवीन तंत्रज्ञान वापरून पुलाची उभारणी केली जाणार असल्याने सागरी किनारा मार्गाचा खर्चही वाढण्याची शक्यता आहे.

    सागरी किनारा मार्गातील नव्या पुलाच्या उभारणीत ‘मोनोपाइल’ तंत्रज्ञान वापरले जाणार आहे. त्यामुळे वीर सावरकर उड्डाणपूल (एमटीएनएल) पाडण्याची गरज भासणार नाही. यासाठी आयआयटीलाही तांत्रिक बाबी तपासणीचा अहवाल सादर केला जाणार आहे. –भूषण गगराणी, आयुक्त, मुंबई महापालिका

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा